Monday, April 29, 2024
HomeUncategorizedकालिदासाचा आषाढ !

कालिदासाचा आषाढ !

– स्वाती पेशवे

कालिदास कधी जन्मला हे ठामपणे कोणताही इतिहासकार सांगू शकत नाही. मात्र ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददश्र्।्।’ या ओळी वाचल्या की त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता बळावते. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी अलिप्त यक्षाने पर्वताच्या माथ्यावर ढग टेकलेले पाहिले तेव्हा त्याला खेळात हत्ती आल्यासारखे वाटलं, असा पुढे त्याचा अर्थबोध होतो…

- Advertisement -

ज्येष्ठ पावसात भिजतो आणि जणू कायापालट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पावसाच्या ओढीने तळमळणारी मनं सुखावतात. तप्त झळांनी भाजून निघालेले मुके जीव विसावतात. अनेक दिवसांची तहान भागल्यामुळे गाई-गुरं मनसोक्त हंबरतात. निसर्गात दाटू पाहणार्‍या हिरवाईला त्यांची ती साद असते. थोडक्यात, पावसाच्या आगमनाने शुष्कतेची जागा सजलता घेते आणि मांगल्याचे पाट वाहणार या आशेनेच मनांना अंकुर फुटू लागतात. आताही आपल्या भावना काहीशा अशाच आहेत. अंदाज चुकवून थोड्या विलंबाने दाखल झाला असला तरी आता पावसाने बहुतांश भाग व्यापला आहे. लवकरच त्याची दमदार बँटिंगही सुरू होईल आणि आषाढझड अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आषाढ हा ऋतूकाळातला ओलाकंच महिना… आषाढातली झड काही विलक्षणच! सध्या हे चित्र काहीसं विस्कळीत अथवा अनियमित झालं असलं तरी आषाढातलं वातावरण अधिक रमणीय असतं हे नाकारण्यात अर्थ नाही. आषाढातला पहिला दिवस तर ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा होणारा एक संस्मरणीय दिवस. प्रत्येकाला कालिदासाचं समग्र चरित्र माहीत असतं अथवा कालिदासाच्या काव्याची ओळख असते असं ठासून सांगता येणार नाही. मात्र कवी कालिदासाविषयी जाणून घेण्याची ओढ मात्र अनेकांना असते. अगदी लहानपणी लिहिलेल्या पावसाळ्यातल्या निबंधामध्ये कालिदासानं आषाढातल्या पहिल्या दिवसाच्या ओळींचा संदर्भ आपल्यापैकी अनेकांनी दिला असेल.

या महाकवीशी झालेली ती पहिली तोंडओळख असते, असंही म्हणता येईल. कालिदास कधी जन्मला हे ठामपणे कोणताही इतिहासकार सांगू शकत नाही. मात्र ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं। वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।’ या ओळी त्या वयात प्रथम नजरेसमोर येतात आणि त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता बळावते. मग पुढे कधी तरी ‘आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी अलिप्त यक्षाने पर्वताच्या माथ्यावर ढग टेकलेले पाहिले तेव्हा त्याला खेळात हत्ती आल्यासारखं वाटलं…’ असा त्याचा अर्थबोध समजतोे तेव्हा अफाट कल्पनाशक्तीचं कौतुक वाटतं आणि या अलौकिक कवीला समर्पित असणार्‍या आषाढातल्या पहिल्या दिनाविषयी ममत्व वाटायला लागतं. महाकवी कालिदास आणि त्याचं अजरामर काव्य मेघदूत… नंतर याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्कंठा वाढू लागते.

कालिदासाची समृद्ध साहित्यसंपदा हा अनमोल ठेवा, पण एका कर्तव्यभ्रष्ट यक्षाची विकलता, विरह, आर्तता, व्याकूळता वर्णन करणार्‍या ‘मेघदूत’ या खंडकाव्याचं जनमानसातलं स्थान काही वेगळंच आहे. या काव्यात कालिदासाने एका यक्षाची विरही अवस्था, प्रेमातुरता, दु:खावेग या सर्वांचं मनोहारी वर्णन केलं आहे. काव्यातला हा कर्तव्यभ्रष्ट यक्ष एक वर्षाची शिक्षा भोगतो आहे. अलकानगरीच्या राजानं त्याला शिक्षा म्हणून एका वर्षासाठी खूप दूरच्या रामगिरी पर्वतावर एकांतवास दिला. मात्र, हा काळ प्रियतमेपासून दूर रहावं लागल्यामुळे त्याच्यासाठी युगासमान आहे. प्रियतमेच्या विरहामुळे वेडापिसा झालेला हा शापित यक्ष तिच्यापर्यंत संदेश पोहोचवू इच्छितो. आपल्या मनातील विरहभावना व्यक्त करू इच्छितो. यासाठी त्याने आधार निवडला एका मेघाचा. पूर्वी पक्षी, वायू, मेघ यांच्यामार्फत सांगावा पोहोचवला जाई. ‘मेघदूत’ हे कालिदासचं खंडकाव्य अशाच एका संदेशाचं प्रतीक आहे. प्रियतमेला पाठवला गेलेला जगातला हा सर्वांगसुंदर संदेश आजही एक मनोज्ञ काव्य म्हणून ओळखला जातो. महाकवी कालिदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे संदेशकाव्य म्हणजे विव्हल मनातले तरंग आणि निसर्गगान यांचा सुंदर मिलाफ आहे. आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघालाच दूत बनवून कवी कालिदासने प्रियतमेला सांगावा धाडला आहे.

अंदाजे चौथं शतक ते सहावं शतक या काळात कालिदास हा महाकवी होऊन गेला असावा, असं मानलं जातं. राजा विक्रमादित्याच्या दरबारातलं ते एक लखलखतं रत्न होतं. मध्य प्रदेशमधल्या उज्जैन आणि काश्मीर या दोनच ठिकाणी त्याचं वसतीस्थान असल्याचं संशोधक मान्य करत आहेत. कालिदासाच्या काव्यांमधून, नाटकांमधून पुढे येणारा निसर्ग, त्यात वर्णन केलेले ऋतूंचे सोहळे या दोन भूभागांशी मिळतेजुळते आहेत.

कवी कालिदासबद्दल अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. कालिदास जात्याच सुदृढ आणि सुस्वरूप होता. परंतु लहानपणीच अनाथ झाल्यानं एका गवळ्यानं त्याचा सांभाळ केला. अर्थातच त्याच्यावर विद्येचे संस्कार झाले नाहीत. तो निरक्षर राहिला. लोक त्याला मूर्ख समजत.

शेजारच्याच एका नगरीतल्या प्रधानाने कपट करून राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला. या राजकन्येला विद्वानाशी विवाह करण्याची इच्छा होती. आपला पती प्रकांडपंडित असावा, या इच्छेने तिने स्वयंवर रचलं होतं. प्रधानाने कपटाने येड्यागबाळ्या कालिदासाला ज्ञानी पुरूषाचा वेश लेववला आणि मौनव्रत असल्यानं हे महाशय खुणाद्वारेच बोलतील, असा युक्तीवाद करत राजकन्येला भुलवलं. राजकन्येनेही दोन-चार प्रश्न विचारून त्याची बुद्धी जोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालिदासाने त्याचा चुकीचा अर्थ लावत मुद्राभिनय आणि हातवार्यांच्या सहाय्यानं उत्तर दिलं. देखण्या आणि तरण्याबांड कालिदासाकडे आकर्षित झालेली राजकन्या या हातवार्यांचा सूक्ष्मार्थ लावत बसली आणि तिथेच फसली. तिने कालिदासाशी विवाह केला. पण पहिल्याच रात्री आपली घोर फसवणूक झाल्याचे ध्यानी येताच अद्वातद्वा बोलून पतीची निर्भत्सना केली. या सर्वामुळे व्यथित आणि अपमानित झालेला कालिदास कालीमातेला शरण गेला. असं म्हणतात, कालिदासाला प्रत्यक्ष कालीने दर्शन दिलं आणि दिव्यज्ञान प्राप्त झालं.

कालिदासाबद्दल आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे अपमानित होऊन बाहेर पडल्यानंतर कालिदास चालत असताना नदीकिनारी कपडे धुवत असलेल्या काही बायका दिसल्या. नदीपात्रातले काही दगड कपड्यांच्या रोजच्या आघातामुळे गुळगुळीत झाले होते तर काही ओबडधोबड होते. हे दृश्य पाहून कालिदासाचा आत्मसन्मान जागृत झाला आणि त्यानंही ज्ञानाचे आणि विद्येचे घाव घालत आपली बुद्धी उजळून टाकण्याचं ठरवलं. या प्रसंगानंतर कालिदास घरी परतला तेव्हा पत्नीने ‘अस्ति कश्चिद्वाग्विष’ असा प्रश्न केला. थोडक्यात तिनं ‘तुझ्या वाणीत आणि वागण्यात काही विशेष आहे का’ असं म्हणत त्याची निर्भत्सनाच केली. पण परतलेला कालिदास पूर्णपणे वेगळाच होता. तो कवित्त्व आणि विद्वत्तेने संपन्न असणारा पुरूष होता. त्याने उत्तरादाखल याच तीन शब्दांवर आधारीत तीन काव्यं केली. त्यात ‘अस्त्युत्तरस्यां दिशि देवातात्मा’ या आरंभाचे ‘कुमारसंभव’, ‘कश्चित्कान्ताविरह गुरूणा’ या आरंभाचे ‘मेघदूत’ आणि ‘वागर्थाविव संपृक्तौ’ यापासून सुरूवात होणारे ‘रघुवंश’ याचा समावेश आहे. पतीच्या या नव्या रूपानं प्रभावित झालेली राजकन्या त्याच्यावर प्रेम करू लागली. मात्र, आता कालिदास बदलला होता. तो पत्नीशी मातृभावनेनं वागू लागला. यामुळे क्रोधित झालेल्या राजकुमारीनं ‘तुला एका स्त्रीच्या हातूनच मरण येईल’ असा शाप दिला आणि दुर्दैवानं तिचा शाप खरा ठरला. त्याबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते.

एकदा कालिदास एका गणिकेबरोबर होता. तेव्हा एक श्लोकार्थ सांगणार्याला बक्षिसाच्या रूपानं राजाने मोठी रक्कम देऊ केली आहे असं त्याला समजलं. ‘कमले कमलोत्पति: श्रूयते न तु दृश्यते’ या श्लोकाचा नेमका अर्थ सांगणार्‍याला भलीमोठी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार होती. याचा अर्थ एका कमळावर दुसर्‍या कमळाची उत्पत्ती कशी होते? गणिकेलाही हा प्रश्न सतावत होता. मात्र, प्रतिभासंपन्न कालिदासाने दुसर्या क्षणी याचं उत्तर दिले. ‘तव मुख्याम्भोजात कथमिन्दीवर द्वय’ अर्थात, तुझ्या मुखकमलावर दोन नेत्ररूपी निळी कमळं दिसताहेत, हा श्लोकार्थ समजावून सांगितला. यामुळे हर्षभारीत झालेल्या गणिकेने बक्षीस स्वरूपातील भली मोठी रक्कम स्वत:ला मिळावी यासाठी कालिदासाचा वध करवला. प्रणयरम्य काव्यं लिहिणार्या या महाकवीचा अंत अशा करूणामय रितीनं ओढवल्याची आख्यायिका ऐकायला मिळते.

अशा या महाकवी कालिदासाचं स्मरण आणि त्याच्या काव्यप्रतिभेचा सन्मान ‘कालिदास दिना’च्या निमित्ताने होतो. महाकवी कालिदासाचं साहित्य अनेक भाषांमध्ये अनुवादीत झालं आहे. आजही त्याच्या सुभाषितांचा अभ्यास केला जातो. संस्कृत महाकाव्यांच्या या कर्त्याने ‘मेघदूत’, ‘रघुवंशम’, ‘कुमारसंभवम्फ, ‘विक्रमोर्वशीयम्फ ‘मालविकाग्नीमित्रम्फ, ‘अभिजातशाकुंतलम्फ आदी साहित्यनिर्मिती केली. देशादेशीच्या ज्येष्ठ साहित्यिकांनी कालिदासाचं साहित्य अभ्यासलं. सिंहली, मंगोली, उजबेकी, जर्मन, फ्रेंच आदी भाषांमध्ये कालिदासाचं साहित्य अनुवादीत झालं आहे. अशा या महान कवीश्रेष्ठाच्या आठवणीत रमून आषाढाचा आनंद लुटू या.

- Advertisment -

ताज्या बातम्या