निळवंडेतून शेतीसाठीचे पहिले आवर्तन सुटले

अकोले | प्रतिनिधी

भंडारदरा व निळवंडे धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी काल (रविवारी) दुपारी 4 वाजता 1500 क्युसेक ने आवर्तन सोडण्यात आले. निळवंडे च्या गेट मधून 800 क्यूसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 700 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.

रब्बी हंगामातील हे पहिलेच आवर्तन होय. कालवा सल्लागार समितीच्या ठरल्या प्रमाणे यावर्षी निळवंडे-भंडारदरा धरणातून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी हंगामासाठी तीन अशी चार आवर्तने देण्यात येणार आहेत. यावर्षीचे हे पहिले आवर्तन चार दिवसांपूर्वीच सोडण्याचे नियोजन होते मात्र निळवंडे धरणाचे गेट नादुरुस्त असल्यामुळे ते नियोजना पेक्षा उशिरा सोडले गेले.

आवर्तन सोडते वेळी भंडारदरा धरणात 10 हजार 803 दलघफू पाणीसाठा होता. तर निळवंडेचा पाणीसाठा 7 हजार 909 दलघफू होता. सुमारे 25 दिवसाच्या या आवर्तनात अंदाजे 2500 ते 3000 दलघफू पाण्याचा वापर होणे अपेक्षित आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता गणेश हारदे यांनी दिली.