नाशिक | Nashik
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात नाशिकमधील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहास महत्त्वाचे स्थान आहे. २ मार्च १९३० ला सुरू झालेला हा लढा पुढील पाच वर्षे सात दिवस चालला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने या सत्याग्रहाच्या आठवणी सांगताहेत नाशिक महानगरपालिकेतील निवृत्त विभागीय अधिकारी विवेक मोहनराव गायकवाड…
“आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण
१९२९ च्या ऑक्टोबर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करुन नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले.
नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते.