धुळे । प्रतिनिधी Dhule
कोरोनावावर प्रतिकात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने 15 दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला मात्र याबाबत धुळ्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारला उशिरा जाग आली असली तरी नियम पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मान्यवरांचे म्हणणे आहे. राज्यात सर्वदूर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे. मृत्यूची संख्याही वाढली आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी”; “मी जबाबदार” असे अभियान राबवूनही फरक पडला नाही. उलट कोरोनाचा हैदोस आणखीच वाढला. यात धुळे, नंदुरबार जिल्हाही मागे नाही.
सरकारने 14 एप्रिलच्या मध्यरात्री पासून ते 30 एप्रिल च्या रात्री पर्यंत जीवनावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केले. याबाबत धुळ्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारला उशिरा जाग
खरे तर हे लॉकडाऊन एक महिन्या पूर्वीच व्हायला हवे होते. सरकारला उशिरा जाग आली पण हरकत नाही. संप्रकाची साखळी तोडणे खूप गरजेचे आहे, असे माजी आमदार प्रा शरद पाटील म्हणाले. जून, जुलै, ऑगस्ट, संप्टेंबर हे चार महिने अतिशय महत्वाचे आहे, अन्यथा परिस्थिती आवरणे अशक्य होईल. जनतेने या लॉक डाऊन प्रतिसाद द्यावा, सहकार्य करावे, असे आव्हानही त्यांनी केले.
तसेच रेमेडिसीवर इंजेक्शन चा काळाबाजार, बिलाची लूट, किंवा परिस्थितीचा कोणीही गैफायदा घेऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लॉकडाऊन: खमण ढोकळा सगळीकडून मोकळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला लॉक डाऊन म्हणजे “खमण ढोकळा अन सगळीकडून मोकळा” असाच आहे. गर्दी करणारे रस्त्यावरील व्यवसाय सुरू आणि बंदिस्त दुकाने मात्र बंद. याचा अर्थ आता दुकानदारांनी लोटगाड्या लावायच्या का? असा प्रश्न भाजपाचे जेष्ठ नगरसेवक हिरामण गवळी यांनी उपस्थित केला. शिवभोजन फुकट देणार पण किती? म्हणजे रस्त्यावे पोलिसांनी अडविले तर लोक सांगतील शिवभोजन खायला जातोय. सरकारने सगळा घोळ करून ठेवलाय. त्यांनी काय सुरू ठेवले आणि काय बंद? हे हातात कागद न घेता त्यांना तरी सांगता येईल का? असेही ते म्हणाले. यापेक्षा एक बाजू एक वेळी तर दुसरी बाजू दुसर्यावली सुरू ठेवायला हवी होती, असे श्री.गवळी यांनी सांगितले.
नियम पाळाल तरच जगाल
कोरोनाची भयावह स्थिती पाहता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम अतिशय महत्वाचे आहेत. ते आपल्या सगळ्यांना पाळावेत लागतील. खरे तर नियम पाळले तरच आपण जिवंत राहू, अशी अटीतटीची परिस्थिती आहे, असे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी सांगितले.