नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सध्या खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे…
सिन्नर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले पाडळी या गावात ज्ञानेश्वर रेवगडे (Dnyaneshwar Revgade) आणि हितेश पटेल (Hitesh Patel) हे तरुण शेतकरी निसर्ग शेती करत आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील १ एकर क्षेत्रावर वेगवेगळी पिके घेतली असून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
सध्या रेवगडे आणि पटेल यांनी १२ ते १३ गुंठ्यात तब्बल ७ ते ८ हजार रोप लावली आहेत. यामध्ये त्यांनी योग्य नियोजन करून कारले, कोबी, गवार, कोथंबीर, दोडका या पिकांची लागवड केली आहे. तसेच पिकांची लागवड केल्यानंतर पुढील ३० दिवसात त्याचे उत्पादन चालू कसे होईल या पद्धतीचे देखील नियोजन केले आहे.
मशागत, व्यवस्थापन आणि नियोजन यावर हे पिक अवलंबून असून ते १२० दिवसांपर्यंत चालते. रेवगडे आणि पटेल यांच्या शेतात कारल्याचे उत्पादन ६० दिवसांपासून चालू आहे. तर कोबीचा गड्डा तयार होण्यासाठी २५ दिवस लागतात त्यानंतर मार्केटमध्ये तो गड्डा २० रुपयाला विकला जातो.
तसेच कमी क्षेत्रामध्ये जास्त उप्तादन घेण्यावर या तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. याशिवाय एका क्षेत्रामधून जास्त पिके कसे घेता येतील यासाठीही हे शेतकरी प्रयत्नशील आहेत. तर शेतीत विविध पिके घेतांना जमीन देखील सांभाळली जात असून जमिनीची सुपीकता कशी टिकून राहील याचाही विचार केला जात आहे.