येवला |प्रतिनिधी
येवल्यात कोथिंबीरीचे भाव इतके गडगडले, की कोथिंबीर जुड्यांचे ढीग टाकून मिळेल कवडी भाव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले आठ महिने येवल्याचा आठवडे बाजार बंद होते.....
या बंद काळात छोटे व्यावसायिक, मजूर यांचे नुकसान झालेच. मात्र सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. आठ महिन्यानंतर दीपोत्सवाच्या निमित्ताने बाजारात बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे.
मात्र, बाजारात शेती मालाला मातीमोल भाव मिळत आहे. आज आठवडे बाजार निमित्ताने देशमाने येथील दत्तू काळे या शेतकऱ्याने छोटा हत्ती या वाहनाने कोथिंबीर विक्रीसाठी आणली. बाजारात हिरव्यागार, अन चांगल्या दर्जाच्या कोथिंबीर कडे ग्राहक ढुंकूनही बघेना.
त्यामुळे काळे यांनी २० - २५ जुड्यांची एक - एक जुडी करून अवघ्या दहा रुपयात विक्री करत होते. मात्र दहा रुपयात मोठी जुडी देऊनही ग्राहक फिरकत नव्हते. काळे यांनी गेल्या आठवड्यात पिकअप भरून कोथिंबीर नाशिक येथे नेली.
तिथे अवघ्या २ हजार २०० रुपयात कोथिंबीर विकावी लागली. त्यात मजुरी व वाहन भाडेही सुटले नाही. फेकून देण्यापेक्षा तोटा थोडा कमी होईल, या आशेने कोथिंबीर विक्री करीत असल्याचे काळे यांनी सांगितले.