Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअशी असते आदिवासी बांधवांची अनोखी ‘होळी’

अशी असते आदिवासी बांधवांची अनोखी ‘होळी’

सुरगाणा । वाजीद शेख

होळी बाय तू भोळी… सदा शिमगा खेळीव..! होळी बायला मानाशू पहिलं कापड चढावशू..! याप्रमाणे नारळ, हारडा, वाट्या, खारका, पापड्या अशा वर्णनाची गाणी शिमगा सणाला आदिवासी भागात कानावर पडतात. आदिवासी भगिनींनी सुमधूर आवाजात गायलेली पारंपरिक गाणी कानाला मधूर वाटतात. या भागात दिवाळी व होळी हे दोन्ही सण धूमधडाक्यात साजरे केले जातात. होळी सणाच्या गीतांमध्ये निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी, झाडे-झुडपे, जल, जंगल, जमीन तसेच भाऊ, बहीण आदी नात्यागोत्यांचे वर्णन केले जाते ते असे, होळी पेटते, पेटते गाव पाटलाच्या मानाने.. होळी मांगते, मांगते मूळ आदिवासींच्या नावाने..

- Advertisement -

गावाच्या पाटलांनी आता निघावं बाहेर.. तुला न्यायालं आलयं कहाळी वाजंत्रीचा आहेर.. सासूनं दिलायं मला, दळणं दळाया.. दळण, दळीते मी कांडण करीते.. ये बंधू ये बंधू मला होळीला न्यायालं.. होळीच्या सणालं मालं पूजन कराया.! अशी भावा- बहिणींची अतूट माया, जिव्हाळा अन् प्रेमाचे वर्णन करणारी गाणी गायली जातात. सातपुडा पर्वत रांगेत जसा भोंगर्‍या बाजार भरतो तसाच या भागात होळीला भरणार्‍या बाजाराला ‘भुर्रकुंड्या बाजार’ असे संबोधले जाते.

या बाजारात नवे कपडे, पूजा साहित्य, नित्य वापरातील भांडी, अलंकार, बांगड्या, मिठाई, खारीक, खजूर, डाळ्या, हारडा, कडे, पादत्राणे, तरुण-तरुणींचा हौस-मौजेच्या चैनीच्या वस्तूंची दुकाने थाटली जातात. तरुण मनगट व दंडावर प्रेमाची प्रतीके तसेच प्रियजनांचे नाव अथवा नावाचे आद्याक्षर काढून गोंदवले जाते. हल्ली टॅटू काढले जाते.

या यात्रेत मनोरंजनासाठी मौत का कुऑ, सर्कस, जादूचे प्रयोग, चक्री पाळणे, खेळ, तमाशा आदी कार्यक्रम सादर होतात. या भागात केवळ चार महिने पडणार्‍या पावसावर शेती अवलंबून असल्याने इतर वेळी कामाच्या शोधात देशी भागातील पिंपळगाव, दिंडोरी, लासलगाव, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव तर गुजरात राज्यातील बिलीमोरा, सुरत, वापी, चिखली, गणदेवी आदी भागात जावे लागते. आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा होळी म्हणजे शिमगा सण होय.

या सणाकरिता तालुक्यातील चाकरमाने, रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले आदिवासी बांधव कुटुंबकबिल्यासह आपापल्या गावी येतात. सणाच्या दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. पैसे नसतील तर घरातील थोडे धान्य विकून सण साजरा केला जातो. जीवनातील दृष्ट प्रवृत्तीचा समूळ नाश करण्यासाठी होळी साजरी केली जाते. आदिवासींच्या परंपरा, रितीरिवाज, सणोत्सव, सांस्कृतिक, परंपरा यामध्येच जीवनाचे मूल्य दडले आहे. आदिवासींच्या देवीदेवता, इष्टदेवता, कुलदेवता, पूर्वजांना नैवेद्य दाखवणे, प्रकृतीही जीवन अशी पूजा केली जाते.

सह्याद्री पर्वत रांगेत निसर्गाच्या कुशीत कोकणा, वारली, महादेव कोळी, भिल्ल, पावरा, मावची, तडवी, गामित, कातकरी, ठाकर या जमाती डोंगर दरीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पूर्वीपासून हा समाज वाघदेव, नागदेव, कणसरी, हिरवा, रानवा, डोंगर माऊली, चंद्र, सूर्य, अग्निदेव, पाणदेव यांची पूजा करत आला आहे. अलीकडे मात्र या संस्कृतीवर इतरांचे आक्रमण होऊ पाहत आहे. होळी सण पाच ते सात दिवस साजरा केला जातो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी लहान होळी रचली जाते. तिला ‘कुक्कड होळी’ म्हटले जाते. लहान मुलांची होळी म्हणून याकडे बघितले जाते.

या होळीकरिता गावातील तरुण, तरुणी, मुले एकत्र येतात. झाडाच्या साली (फाफतर) वाळलेली लाकडे जमा करून शिरीष या झाडाचा सोटा आणून खांब गाडला जातो. खांबाभोवती लाकडे, साली व गवत रचतात. सात ते आठ वाजेच्या सुमारास ही कुक्कड होळी पेटवतात. या होळीला मोठी माणसे उपस्थित नसतात. खांबाला शेणाच्या गोवर्‍या बांधतात. शेरोड, इळिंग या औषधी वनस्पतींचा निळा (ओला) सोटा, सोट्या आणून होळीच्या आगीत तापवून दगडावर जोरात आपटल्याने बंदुकीच्या छर्‍यासारखा मोठा आवाज होतो. यावेळी मुले बोंबाबोंब करतात. शेजारच्या गावाला लाखोली वाहतात. त्यास ‘गूढ’ टाकणे असे म्हणतात.

दुसर्‍या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते. सायंकाळी 5 वाजेनंतर ही होळी रचतात. प्रत्येक कुटुंबातील सदस्याने जंगलात जाऊन वाळलेले लाकूड (खापर) आणून होळीजवळ टाकायचे. होळी रचायला गावातील कोतवाल नगारा वाजवून दवंडी पिटवतो. नगारा व कहाळी वाजंत्री घेऊन जंगलातील शिरीष किंवा काटे साबरीचा खांब वाजतगाजत आणला जातो. पोलीसपाटलाला मूळ करून वाजतगाजत घरून होळीजवळ आणतात.

गावातील गावगुंड्या भगत (पुजारी) कोंबड्याचा बळी देऊन तांदळाच्या पुंजक्या (पुंजळ्या) पाडून आंब्याच्या पानांचे तोरण बांधून, सागाची पाने असलेल्या फांदीची पूजाअर्चा करतात. या पूजेत भगत निसर्ग देवता, अग्निमातेला नवस बोलतो, आमच्या गावाला सुख-समृद्धी लाभू दे. अग्नी, जल, वायू, वादळ (झगार), धरणीकंप, रोगराई या नैसर्गिक संकटांपासून रक्षण कर. पापी, दृष्ट प्रवृतीचा नाश कर, पाऊस पाणी भरपूर पडू दे, धनधान्याची बरकत होऊ दे, गुरे-वासरांचा सांभाळ कर, अशी प्रार्थना होळीला केली जाते. पूजेनंतर होळी पेटवली जाते. होळी लावण्याचा मान पोलीसपाटलाचा असतो. होळी पेटवताना खांब पूर्वेला पडला तर शुभ मानले जाते.

खांबाला तांदळाच्या पिठाच्या भाकरी बांधतात. त्याला पापड्या म्हणतात. वाजंत्री, ढोल, नगारा, वाजवत गाणी गात होळीभोवती फेर धरून सर्वजण आनंदाने नाचतात. तालुक्यात यात्रेत तूर, मादोळ, ठाकर्‍या नाच, देवीचा मुखवटा नाचवून फाग मागितला जातो. त्यास ‘भुर्रकुंड्या बाजार’ असे म्हणतात.

आजच्या या विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल युगात आदिवासी समाजातील रुढी, परंपरा, चालीरिती काही प्रमाणात लोप पावत आहेत. आदिवासींच्या लोककला, मौखिक परंपरेने आलेले लोकसाहित्य, लोकसंस्कृती नष्ट होत आहेत. या समाजात अनेक गोष्टी चांगल्या आहेत. जसे मुलगी झाल्यास आनंदोत्सव साजरा केला जातो, स्त्रीभ्रूणहत्या केली जात नाही, थोरांचा मानसन्मान केला जातो, चोरी, बलात्कार केला जात नाही, कर्मकांडांचे थोतांड केले जात नाही, असे एक ना अनेक संस्कार चांगले आहेत. एकविसाव्या शतकात स्वतःला उच्चशिक्षित, सुधारलेले समजणार्‍यांकडून हरताळ फासला जात आहे.

आदिवासी समाजाकडे संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. तो वारसा जपून ठेण्यासाठी समाजाने पुढे यावे. आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरून मुलींच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीचा आलेख उंचावणे गरजेच आहे, असे आवाहन आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांकडून करण्यात येत आहे.

होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. होळी माणसाला माणूस बनवते, म्हणून म्हटले जाते ‘आदिवासींची होळी, इडा पिडा जाळी!’
निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असे सर्व देते, मायेच्या आशीर्वादासह वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. हाच होळीचा ठेवा आहे.

आदिवासी निसर्गाला देव मानणारा आहे. निसर्ग आहे म्हणून आपण जगतो. आदिवासी जीवन व्यवहाराची मूल्ये उद्घोषित केली जातात. होळी लावण्यासाठी सगळ्यांची वाट पाहणे हे सामूहिक निर्णय व समानतेचे मूल्य प्रतिबिंबीत करणारे वर्तन आहे. सोन्याचे बंधन याचा अर्थ माणसांचे नियम, मर्यादा, नीतिमत्तेशी येतो. असे नियम, मर्यादा ज्या चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक आहेत. असे नियम, मर्यादा माणसे कुठल्याही लिखित कायद्याविना पाळतात.

वाईट चालीरिती बंद कराव्या

होळी हा खरा आदिवासींचा सण किंवा उत्सव. आदिवासी गवत, गोवर्‍या, झाडाच्या फांद्यांची होळी पेटवतात. आपल्या समाजातील चांगल्या प्रथा, रुढी, परंपरा सुरू ठेवाव्या व वाईट चालीरिती बंद कराव्या.

रतन चौधरी, डांगी भाषा अभ्यासक

- Advertisment -

ताज्या बातम्या