Video: शिवरायांच्या 200 किल्ल्यांची सफर करणारा बेल्जियम ‘अवलिया’

Video: शिवरायांच्या 200 किल्ल्यांची सफर करणारा बेल्जियम ‘अवलिया’

ऑफलाईन जीपीएस, पिठलं भाकरी सोबत मिळालं भरपुर प्रेम

नाशिक । प्रतिनिधी

भारतातील निसर्गसौंदर्यांची मोहिनी पडलेल्या बेल्जियममधील अवलीयाने अवघ्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोनशे किल्ले सर केल्याचा विक्रम केला. पीटर गेट असे या अवलियाचे नाव आहे. आज नाशिकमध्ये अनुभव कथनाचा कार्यक्रम सावरकर नगर येथील ठाकुर रेसिडेन्सिमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नाशिककरांची उपस्थिती होती.

यावेळी पीटरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्ंयांवरील अनुभव कथन केले. तसेच अनोळखी व्यक्ती निर्मनुष्य असलेल्या भागात कशाप्रकारे जाऊ शकते. त्याच्यापुढील काय आव्हाने असू शकतात. याबाबतही पीटरने मार्गदर्शन केले.

हिमालयातील खडतर भागात जाऊन नुकत्याच परतलेल्या पीटरने गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील 200 किल्ले सर केले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहेत. राजांच्या पराक्रमाची यशोगाथा समजून घेत आहेत. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि एवढ्या कमी मावळ्यांमध्ये उभारलेल्या किल्ल्यांची महती पीटरला भावते.

पीटरने उंच गडकिल्ले सर करण्यासाठी आपल्यासोबत कमी वजन असावे यासाठीची काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू घेऊन त्यांची भटकंती सुरू केली.

हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका असल्याचे ते बोलून दाखवतात.

हरीहर किल्यावर गेलो होतो, तिथे एका मातीच्या घरात मला पिठलं आणि भाकरी खायला मिळाली. खुप कमी वेळेत मला ते जेवण तेथील रहिवाशांनी दिले. त्यामूळे मला ते शिकण्याचा मोह झाला. मी भाकारी बनविणे तिथे शिकलो. त्या घरात माझे जेवण भारतातले आजवरचे सर्वांत छान आणि आठवणीत राहणारे जेवण असल्याचे पीटर म्हणाला.

महाराष्ट्राने प्रेम दिलं

मी मूळ धावपटू असल्याने फिटनेस आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे. एका दिवसात आठ किल्ले सर केले आहेत. परदेशातील व्यक्तीमहाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना फार कौतुक वाटतं. महाराष्ट्रात खुप चांगली माणसं आहेत. खुप प्रेम मला मिळालं.

पीटर गेट, अवलिया

ही काळजी घेतली

किल्ले अतिउंच आहेत त्यामूळे कमीत कमी सामान सोबतीला घेतले. यात अंगावर हलके आणि पातळ कपडे, स्लिपींग बॅग, सर्व गोष्टी धरुन तीन किलो वजन बाळगले.

यामुळे नाराजी

गडकिल्ले पाहूण प्रेरणा मिळते, पण रस्त्यात चिप्सचे पाकीटे, पाण्याच्या बाटल्या तसेच किल्ल्यांच्या भिंतिंवर लिहिलेलें आणि चित्रविचित्र आकृत्यांमूळे वाईट वाटलं. परंतू चिप्सच्या पाकीटांनी मला रस्ता असल्याचा मार्गही दाखवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com