नाशिक | प्रतिनिधी
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी अखेर ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या २९ फेब्रुवारी २०२०, शनिवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसाच्या आठवड्यासह सरकारने शासकीय कामाचा वेळ वाढवला आहे. यामुळे आता शासकीय कार्यालये सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उघडी राहणार आहे.
नव्या वेळेनुसार सकाळी पावणेदहा वाजता कार्यालये सुरु होणार असून सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यात मात्र शिपायांसाठी वेळी कार्यालयीन वेळ असणार आहे. शिपायांना सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात हजर व्हावे लागणार असून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत थांबावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक स्तरावरून टीकाही करण्यात आली होती. यावर सरकारने कामाचा वेळ वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांना सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सरकारी कार्यालये उघडी असणार आहे.
तसेच, औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत. अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकरात मोडणाऱ्या इतर कार्यालयांना सुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.