किरकोळ वादातून विवाहितेची आत्महत्या

किरकोळ वादातून विवाहितेची आत्महत्या

नाशिक । पती-पत्नीचे किरकोळ भांडण झाले असता, नातलगांनी दोघांमध्ये समझोताही घडवून आणला. मात्र विवाहितेने रागाच्या भरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारात घडली.

याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रतिक्षा शांताराम जाधव (25, रा. माडसांगवी, ता. नाशिक) असे विवाहितेचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी दोघा पती-पत्नीत किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर सासर आणि माहेरच्या नातलगांनी दोघांची समजूत काढून समझोता केला होता. त्यानंतर नातलग निघून गेले.

तसेच प्रतिक्षाचा पती शांताराम हा देखील सराफ दुकानात सेल्समन असल्याने कामावर निघून गेला. यावेळी घरात फक्त प्रतिक्षा, तिची सासू आणि 8 व 6 वर्षांची दोन मुले होती.

सासू लहान मुलांना खेळवत असतांना प्रतिक्षाने दुसर्‍या खोलीत जाऊन गळफास लाऊन घेत आत्महत्या केली. घटना लक्षात आल्यावर तिला तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय आधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचा तपास हवालदार ढिकले करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com