नाशिक । प्रतिनिधी
करोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. मोठ्या शहरातील मजुर गावाकडे मिळेल त्या वाहनाने परतू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मूंबईहून लोंढेच्या लोंढे पायी मायभुमी गाठण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना नाशिकमधील चहा कट्ट्यावर निवांतक्षणी भेटणार्या एका ग्रुपने मदतीचा हात दिला आहे.
महिनाभरापासून अविरत सेवा सुरु ठेवणार्या या ग्रुपचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांकडे पैसे नव्हते त्यांचे तिकीट या ग्रुपने काढून दिले अशा जवळपास 35 पेक्षा अधिक उत्तर भारतीयांना गावाकडे पाठविण्यासाठी मदत केली.
शहरातील चाय कट्टा आणि जैन ग्रुपमधील सदस्यांचा या सामाजिक कामात हातभार लागला. त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील विल्लोळी आणि जऊळके याठिकाणी पायी चालणार्या नागरीकांसाठी स्टॉल लावले होते. रणरणत्या उन्हात उत्तर भारतीय आपल्या गावाकडे कुच करत होते. त्यांना सेवाभावी वृत्तीने फळे, ज्युस चालत्या प्रवासात उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच दहाच्या सुमारास या नागरीकांसाठी खिचडीचेदेखील वाटप केले जाई.
याठिकाणी वस्तु सोबत न नेता, आराम करत आहेत त्याच ठिकाणी खाण्यासाठी ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले होते. अनेकांच्या पायात भेगा पडल्या होत्या. अनेकांचे गुडघे दुखत होते. अशा नागरीकांसाठीदेखील ग्रुपकडून मलम, बेल्टची व्यवस्था करण्यात आली होती. एकट्याने सुरु केलेल्या कामात संपुर्ण ग्रुपकडून सहकार्य मिळाल्याचे समाधान पंकज गोगड यांनी व्यक्त केले.
यावेळी नागरीकांना मोसंबी, केळी, गुळ, लेमन गोळ्या, लिंबू पाणी, सकाळ व संध्याकाळ खिचडी व चहा, लहान मुलांना बिस्कीट, इलेक्ट्रॉल पावड, वेगवेगळी औषधे, पायाची जखम साफ करण्याची व्यवस्था, रोजा साठी वेगळी व्यवस्था याठिकाणी करुन देण्यात आली होती. सायकलवर प्रवार करणार्या नागरीकांसाठी हवा भरणे व पंचर काढण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.
अनेक नागरीक चालून चालून त्यांच्या पायातील चपला झिजल्या होत्या. त्यांच्यासाठीही पाचशेहून अधिक चपलांचे जोड देण्यात आले होते. लहान मुलांचीही संख्या यामध्ये अधिक होती, त्यामूळे त्यांचीही सोय करण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून बाबा गाड्या ज्या सर्वसामान्यांनी दान केल्या होत्या त्याही देण्यात आल्या.