Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकद्वारका येथील सर्कल काढून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी – भुजबळ

द्वारका येथील सर्कल काढून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी – भुजबळ

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा

कार्यान्वित करण्याची मागणी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या द्वारका येथील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून मुंबईच्या धर्तीवर ट्राफिक आयलंड काढून याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक बी.एस. साळुंखे यांना दिले आहे.

- Advertisement -

ना.छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात आज नाशिक शहरातील राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक बी.एस. साळुंखे, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

ना.छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेतला. यावेळी द्वारका सर्कल येथील ट्राफिक सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा झाली. मुंबईमधील हाजी आली येथे ट्राफिक आयलंड असतांना तेथील ट्राफिक मोठ्या प्रमाणात जाम होत होती.

वाहतूक तज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर तेथील आयलंड काढून सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर तेथील ट्राफिक सुरळीत सुरु झाली. त्यामुळे हाजी आलीच्या धर्तीवर द्वारका येथील सर्कल काढून नाशिक शहर पोलीस व राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वय साधून याठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या द्वारका सर्कल येथील वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी द्वारका पुलाच्या वरून जाणारा सारडा सर्कल ते नाशिक रोड फ्लायओव्हर ब्रिजचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून शासनास पाठवावा असे आदेश त्यांनी दिले.

त्याचबरोबर द्वारका येथील अंडरपास येथे पादचारी, रिक्षा, मोटार सायकल व छोटी वाहने जाण्यासाठी तसेच औरंगाबाद रोड येथे उड्डाणपूल उतरण्यासाठी तसेच मुंबई नाका व इंदिरानगर बोगद्यातील ट्राफिकचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी इंदिरानगर बोगदा डबल करणे, तसेच साईसाया हॉटेल जवळ उड्डाणपूल चढण्या,उतरण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी.

घोटी येथील दोन जंग्शन जागी उड्डाणपूल करणे त्याचप्रमाणे घोटी ते पिंपरी सदो सहापदरी रस्ता करणे यासाठी शासनास तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा असे आदेश यावेळी ना. छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या