चांदवडजवळच्या राहुड घाटात चार वाहनांचा भीषण अपघात

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनवर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन ट्रक आणि एका कारचा भीषण अपघात झाला. अपघात ट्रकमधून प्रवास करत असलेले परप्रांतीय नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या अपघात तिन्ही ट्रकच्या मध्ये कार आल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील प्रवाशी जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू आहे.

करोनाच्या उद्रेकामुळे मुंबईहून उत्तर भारताच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने नागरिक आपल्या मायभूमीकडे परतत आहेत.  आजही तीन ट्रक प्रवाशांनी भरून नागरिक निघालेले होते. चांदवड शहर पास केल्यानंतर पुढे राहूड घाटात एक कारचा अचानक वेग कमी झाला. यामुळे ट्रक या कारवर जाऊन आदळला. इतर दोन्ही ट्रक अपघातग्रस्त वाहनांना चुकविण्याच्या नादात डिव्हाईडर तोडून या वाहनांवर जाऊन आदळला.

या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे, तर इतर तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे. चार वाहने अपघात ग्रस्त झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक कोलमडली  आहे. घटनास्थळी सोमा टोल येथील कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातात जवळपास २०-२५ जन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात गंभीर जखमींची संख्या अधिक आहे.

अचानक झालेल्या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अखेर एका बाजूने वाहतूक सुरु करून चारही वाहने रस्त्यावर बाजूला करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून स्थानिकांच्या माध्यमातून मदतकार्य केले जात आहे.

(फोटो : वैभव पवार, देवळा)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *