नागरिकांच्या समस्या व तक्रारींसाठी ‘माझा महापौर’ अन् ‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रमची घोषणा

नागरिकांच्या समस्या व तक्रारींसाठी ‘माझा महापौर’ अन् ‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रमची घोषणा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिककरांना आपल्या तक्रारी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने सोडवण्यासाठी माजी आयुक्तांनी ऑनलाईन तक्रारीची व्यवस्था एनएमसी इ-कनेक्ट अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. आता या अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यात येऊन नागरिकांच्या समस्या व तक्रारींसाठी ‘माझा महापौर’ ही स्वतंत्र विंडो कार्यरत केली जाणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी ‘महापौर आपल्या दारी’ यासह अनेक उपक्रमांची घोषणा करीत सत्ताधारी भाजपने आता नाशिककरांशी जवळीक साधण्याचे काम सुरू केले आहे.

अलीकडे राज्यात आणि जिल्ह्यात भाजपची लोकप्रियता कमी होत चालली असून याचे परिणाम नाशिक शहरात दिसून आले आहेत. भाजपतील नाराजी लक्षात घेत आता पक्षाकडून विविध कार्यक्रम घेतले जात असताना महापौरांनी आता नाशिकककरांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत नवीन वर्षातील काही उपक्रमांची घोषणा केली.

यात नाशिककरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने एनएमसी इ-कनेक्ट अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यात येत असून ‘माझा महापौर’ ही नवीन विंडो ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना आपल्या सूचना व समस्या मांडता येणार आहेत. या सूचनांची अंमलबजावणी तसेच समस्यांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांनी या विंडोवर थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

यापुढे दर शनिवारी ‘महापौर तुमच्या दारी’अंतर्गत महापौर तुमच्या प्रभागात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्याची सुरुवात पुढील शनिवारी (दि. ११) सकाळच्या सत्रात प्रभाग ३१ पासून सुरू होणार असल्याचे सांगत महापौर म्हणाले, हा उपक्रम उतरत्या क्रमाने पूर्ण केला जाणार आहे. महापालिका पदाधिकारी आणि संबंधित प्रभागातील नगरसेवकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महापालिकेतील २३ खेड्यांचा परिसर असलेल्या प्रभागांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाणार आहे.

देशातील पवित्र शहर असलेल्या नाशिकनगरीत दररोज हजारो पर्यटक व भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती या केंद्रामार्फत पर्यटक, भाविकांना या केंद्रातून दिली जाईल. शहरातील पार्किंग समस्या लक्षात घेऊन महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी पुढील वर्षातील अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे.

भाजीविक्रेत्यांसाठी बहुमजली भाजीमार्केट उभारले जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यापासून शहरात स्वच्छतादूत अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेप्रसंगी उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com