कांदा बटाटा विभागाचे व्यवहार पाच तासांवर; बाजार समितीचा निर्णय

jalgaon-digital
2 Min Read

पंचवटी | वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत गर्दी टाळण्यासाठी पेठरोड वरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील कांदा बटाटा विभागातील व्यवहार उद्या शनिवार (दि .११)पासून केवळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण काळे व व्यापारी असोसिएशनचे मनोज नलावडे यांनी दिली .

कोरोना संसर्ग वाढण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत असून बाजार समितीत मोठया प्रमाणात शेतकरी , व्यापारी आदींची गर्दी होत असते.

त्यादृष्टीने पेठरोड वरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाच्या आवारातील कांदा बटाटा विभागात बाजार समितीचे सचिव अरुण काळे बाजार समितीचे संचालक चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, संचालक रविंद्र भोये, कांदा बटाटा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज नलावडे यांची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत शनिवार( दि .११) पासून लॉक डाऊन उठेपर्यंत कांदा बटाटा मालाचे व्यवहार सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर मात्र सर्व व्यवहार बंद राहतील . त्यानंतर बाजार समितीत आलेल्या मालाचे व्यवहार दुसऱ्या दिवशी करण्यात येतील .

दुपारी १ वाजेनंतर कोणताही व्यापारी व्यापार करणार नसून बाजार समितीत माल उतरवला अथवा भरला जाणार नाही असे बैठकीत ठरविण्यात आले. दरम्यान याच कालावधीत खरेदी – विक्री करणे वजन करणे माल भरणे आणि खरेदी करणे माल उतरवणे , खाली करणे तसेच मालाचे पैसे देणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले असून याची सर्व जबाबदारी संबंधित आडते , व्यापारी आणि माथाडी कामगार यांनी घ्यायची आहे .

त्यामुळे व्यापारी व आडते यांनी शेतकऱ्यांना सदरची माहिती देऊन आपला शेतमाल संबंधित वेळेतच विक्रीसाठी आणावा तसेच खरेदीदार यांनीही याच दरम्यान माल खरेदी करावा, किरकोळ विक्री करता येणार नाही अशा सूचना कराव्यात . शासनाने वेळोवेळी केलेल्या आदेशांचे व सूचनांचे सर्व बाजार घटकांना काटेकोरपणे पालन करावे, याबाबत नियमांचे पालन न केल्यास बाजार समितीकडून दंडात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *