नाशिक | प्रतिनिधी
लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार नाशिकमध्ये होते. या नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले आहे. या ट्रेन मधील नागरिकांशी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी संवाद साधला तसेच ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आज नाशिक जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या मुळच्या उत्तर प्रदेशातील ८४७ मजुरांना मुंबईहून आलेल्या विशेष रेल्वेने लखनौकडे रवाना करण्यात आले.
आज उत्तर प्रदेश लखनऊ येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. काल (दि. ०१) रोजी ३४१ प्रवाशांना घेऊन एक गाडी मध्यप्रदेश येथे रवाना करण्यात आली होती.
त्यानंतर आज साडेआठशे नागरिकांना घेऊन या गाडीने लखनऊकडे नाशिकरोड रेल्वे स्थानकातून निर्गमन केले. या नागरिकांना जाताना पाण्याच्या बाटल्या, जेवण, बिस्किट सर्व काही देऊन रवाना करण्यात आले. रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी “जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद” असा घोषणा देत आभार मानले.
देश म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज दुणावला असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.