◾️आजपर्यंत झाले ₹२४९ कोटींचे कर्ज वाटप
◾️ जिल्हा प्रशासनाच्या सततच्या पाठपुराव्याला यश
◾️दहा दिवसात झाली पाच पटींनी वाढ
◾️दर बुधवारच्या आढावा बैठकींचा सकारात्मक परिणाम
◾️स्थानिक पातळीवरही पीक कर्जाच्या अडचणी दूर करण्यात येतील
नाशिक | प्रतिनिधी
गेल्या १० दिवस अगोदरपर्यंत केवळ ४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले होते, पंरतु जिल्हा प्रशासनाचा सततचा पाठपुरावा आणि बँकांशी ठेवलेल्या संपर्कामुळे आजपर्यंत २४९ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वाटप झाले आहे. या कर्जवाटपात जवळपास पाचपटींनी वाढ झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पीक कर्ज वाटप संदर्भात साप्ताहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ भारती पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने व प्रमुख दहा बँकांचे झोनल प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, पीक कर्ज वाटप करतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या आठवड्यात नियोजन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरही अडचणी दूर करण्यात येतील, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत १ लाख ३७ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र झाले आहेत. त्यांना ग्रामपंचायतींची आचारसंहिता व कोरोना संकटामुळे कर्जवाटप झाले नव्हते.
परंतु आता बँकांच्या मदतीने त्यांना लवकरच कर्जपुरवठा केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्याला सगळ्यात जास्त कर्ज वाटपाचे उद्दीष्टे असूनही उद्दिष्टपूर्ती चे प्रमाण चांगले आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा क्रमांक अग्रभागी असल्याचेही मांढरे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कर्जपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक बुधवारी घेण्यात येणाऱ्या बैठकींचा चांगला परिणाम होणार आहे. जिल्ह्याचे उद्दीष्टे पूर्ण करण्यास आपण नक्कीच यशस्वी होणार, असा आशावादही मांढरे यांनी व्यक्त केला.