देशदूत संवाद कट्टा : अन्न वाया घालवू नका; गरजेपुरतेच घ्या

नाशिक : अन्नाद्वारे भुख भागवणे हा मूळ उद्देश असला तरी अधाशीपणाने जास्त अन्न घेऊन ते उष्टे टाकण्याच्या प्रकाराला आळा घालणे काळाची गरज आहे. लग्न, पार्टी, घरात नावडते अन्न सर्रासपणे टाकून दिले जाते. लहानपणी अन्न संपव सांगणारे मोठेपणी सरळ ताट वाया घालवताना दिसतात. त्यांच्या या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. आपल्या पोटाच्या गरजेएवढेच अन्न आपण ताटात घेण्याबद्दल जागरुकता वाढवणे गरजेचे असल्याचा सूर या चर्चासत्रातून उमटला.

‘देशदूत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संवाद कट्टा उपक्रमात ‘अन्नाची नासाडी’ या विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. या उपक्रमात नातू केटरर्सचे संचालक अरुण नातू, हॉटेल करी लिव्हजच्या संचालिका वर्षा उगले-गामणे, जैन युवा संघटनेचे मयूर भंंडारी, हॉटेल पंचमचे व्यवस्थापक प्रवीण पवार हे सहभागी झाले होते.

देशातील अन्न उत्पादनावर पाणी वीज श्रमशक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यातून ते शिजवण्यासाठी मोठा खर्च असतो.
काही समाजाद्वारे सामाजिक कार्यात जेवणावळीच्या शेवटी ताट जमा करताना ज्येष्ठ माणूस उभा राहतो व अन्न संपवण्याला भाग पाडतो. यावर काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जैन धर्मगुरुंनी चातुर्मासात प्रत्येक बांधवाने आपल्या घरातील लग्नकार्यात 21 ते 31 पदार्थांच्यावर पदार्थ न ठेवण्यासाठी बंधन घातलेले आहे.

त्यापेक्षा जास्त ठेवू नये, असे आवाहन करून फॉर्म भरून घेतले. विशेष म्हणजे ते भरून देण्यात युवक मोठ्या संख्येने पुढे आलेले आहेत. पूर्वी घराघरातून संस्कार केले जात होते. त्यातून एक पिढी तयारही झालेली आहे. मात्र आजच्या मुलांना बंधन मान्य नाहीत त्यांना सर्व काही ‘टेस्ट’ करायचे आहे. त्यातून वेस्टेज जास्त होत असल्याचे मत या चर्चेत मान्यवरांनी व्यक्त केले.

हॉटेल व्यवसायात ग्राहक त्या अन्नाचे पैसे मोजत असल्याने ते वाया घालवण्यावर फार भर राहत नाही. त्यातून सेवकांना हॉटेलात येणार्‍या माणसांच्या पटीत अन्नाची ऑर्डर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून उरले तर पॅकिंग करून ग्राहकांना दिले जाते. ते दुसर्‍या दिवशी घरी खाता येणार असल्याने वाया जात नाही.

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. त्यांची मूल्य जपणे गरजेचे आहे. अन्नपदार्थ बनवताना त्यात साधने वित्तीय तसेच भावनिक रसायन ओतले जाते. त्यातील प्रेम, कष्ट यांची गुंतवणूक असते. त्यांचा सन्मान होण गरजेचे आहे. समाजात खूप लोक उपाशी आहेत. त्यांनाही अन्नाची गरज आहे. त्यामुळे आपल्या ताटातील अन्न वाया जाणार नाही, यासाठी सर्वांनी जागरुकता बाळगणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

देशदूतचे ‘सामाजिक भान’ उपक्रम
देशदूतच्या माध्यमातून समाजाला त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देताना त्यातील सामाजिक जाणीवांची ओळख करून देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. या मालिकेत विविध सामाजिक प्रश्नांवर मान्यवरांच्या माध्यमातून चर्चा करण्यात येते, त्याच उपक्रमांंच्या मालिकेत अन्नपदार्थांची नासाडी (फूड वेस्टेज) या विषयावर चर्चा करण्यात आली.