Wednesday, April 24, 2024
Homeनगरभाजीपाला विक्री फेरीव्दारे तर किराणा दुकाना समोर दोन व्यक्तीत अंतर; जिल्हा प्रशासनाने...

भाजीपाला विक्री फेरीव्दारे तर किराणा दुकाना समोर दोन व्यक्तीत अंतर; जिल्हा प्रशासनाने केल्या सुचना

पोल्ट्री आणि पशुखाद्य दुकाने सुरू राहतील

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत अनावश्यकरित्या नागरिक घराबाहेर येणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. भाजीपाला विक्री फेरीद्वारे करण्याचे, तसेच किराणा दुकान समोर दोन व्यक्तींमध्ये अंतर राहील अशा पद्धतीने अनेक ठिकाणी नियोजन करण्यात आले. दरम्यान पोल्ट्री आणि पशुखाद्य दुकाने सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच त्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देशही दिले असून बुधवारी सकाळीच विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक घराबाहेर येत होते, तेव्हा संबंधित दुकानासमोर त्या दोन व्यक्तींमध्ये किमान अंतर राहील याची काळजी दुकानदारांकडून घेतली जात होती. ज्या ठिकाणी या निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले तेथील दुकानदारांना संबंधित नगरपालिका तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने समज देण्यात आली.

किराणा विक्री करणार्‍या दुकानदारांनी घरपोच किराणा देता येईल का याबाबत नियोजन करावे तसेच नागरिकांनीही त्यात सोसायटीतील किंवा एकाच परिसरात राहणार्‍या नागरिकांनी त्यांची मागणी संबंधित दुकानदाराकडे नोंदवली तर घरपोच किराणामाल पोहोचणे शक्य आहे. तसे नियोजन स्थानिक स्तरावर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवा वस्तू व पुरवठा आणि त्यांची वाहतूक याबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची तेथे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री व पुरवठयाबाबत, वाहतुकीबाबत काही अडचणी येत असल्यास त्याबाबत या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या