अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार 31 मार्चपर्यंत भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले असून भाजीपाला विक्री करणार्या लोकांना फेरीव्दारे किंवा एखादया ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विक्रेत्यास गर्दी टाळून) परवानगी राहील. या आदेशाची आजपासूनच तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.
कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी एक भाग म्हणून भाजी बाजाराचे ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोणतीही व्यक्ती/संस्था/सघटना यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार ते दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गर्दी टाळणेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला बाजारासही 31 मार्चपर्यंत प्रतिबंध केला असून, त्याची अँमलबजावणी सुरू आहे.