मनमाड : कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कंबर कसली असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जनता कर्फ्युच्या हाकेला मनमाड शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी शंभर टक्के कडकडीत बंद पाळून घरात थांबणे पसंत केले.
दरम्यान जनता कर्फ्युला मनमाड शहरात देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मनमाड रेल्वे स्थानकावरून रोज १२५ प्रवासी गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे सर्वच प्लॉट फार्मवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र आज जनता कर्फ्युमुळे रेल्वे स्थानकावर देखील शुकशुकाट पसरलेला होता. प्लॉट फार्मवर प्रवशांऐवजी आरपीएफ दिसत होते. तसेच रविवारी असणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आला असल्याने येथेही शांतता होती.
मनमाड शहरातून पुणे-इंदौर महामार्ग जातो या मार्गावर 24 तास वाहनांची ये-जा होत असते मात्र जनता कर्फ्युमुळे महामार्गावर शुकशुकाट होता. बस स्थानकावर बसेस उभ्या होत्या. बाजार समितीचे कामकाज ठप्प होते.कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाची नागरिकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करत आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण शहरात स्मशान शांतता पसरली होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारी देखील शहरातील किराणा,मेडिकल यासह भाजीपाला मार्केट वगळता हॉटेल्ससह सर्व व्यवहार ठप्प होते.सलग दोन दिवसा पासून शहरातील व्यवहार बंद असल्यामुळे हातावर पोट भरणारे गोरगरीबावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.