नाशिकच्या बोरगड परिसरात अवतरला मानवतेचा कुंभमेळा

नाशिक : चला, आपण आपले जीवन कृतज्ञतेच्या भावनेने सजवु या. निराकार प्रभुने आम्हाला दिलेले हे जीवन ही एक अमूल्य देणगी आहे. ईश्वर आम्हाला शक्य असलेले सर्वोत्तम तेच प्रदान करत असतो. कृतज्ञतेचा भाव हृदयामध्ये धारण करता यावा.” असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी महाराष्ट्राच्या ५३व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना केले.

नाशिकच्या बोरगड परिसरामध्ये आयोजित हा संत समागम म्हणजे जणू मानवतेचा कुंभमेळा भरला आहे. या कार्यक्रमामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशविदेशातून लाखोंचा जनसागर लोटला आहे. सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की कृतज्ञतेचा भाव धारण केल्याने आपल्या अंतरात शांती नांदू लागते. आपण सहनशीलता, क्षमाशिलता, सद्व्यवहार आणि प्रेम यांसारखे दिव्य गुण धारण करुन आपले जीवन सहज-सुंदर बनवू शकतो.

त्यांनी पुढे प्रतिपादन केले, परमात्मा स्थिर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याशी नाते जोडतो तेव्हा आपल्याही जीवनात स्थिरता प्राप्त होते आणि सुख-दु:खाच्या पलिकडे जाऊन आनंदाच्या अवस्थेमध्ये आपण स्थित होतो. पुरातन गुरु-पीर-पैगंबर आणि पवित्र ग्रंथांमधील वाणीनुसार संत निरंकारी मिशनही मागील ९० वर्षांपासून हा संदेश जगाला देत आहे.

या समागमामध्ये भाविक-भक्तगण रेल्वे, बस, मोटारी व इतर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या साधनांनी समागम स्थळावर पोचत आहेत. त्यांच्या आगमनामुळे नाशिकवासियांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी सुरळीत वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे.

समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ रंगीबेरंगी आणि रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. सेवादलाच्या हजारो पुरुष व महिला स्वयंसेवकांनी या रॅलीमध्ये आपापल्या गणवेषामध्ये भाग घेतला. हे सेवादल स्वयंसेवक सत्संग समारोह, संत समागम यांच्या व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतातच शिवाय मिशनच्या देश-विदेशातील सामाजिक कार्यामध्ये आपले मोलाचे योगदान देतात. त्यानंतर देश-विदेशातून आलेल्या वक्त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, अहिराणी, कन्नड, सिंधी, बंजारा, भोजपुरी, पंजाबी, बंगाली आणि नेपाळी इत्यादी भाषांतून विचार, भजने, भक्तिरचना, कविता आदि माध्यमांतून आपले भाव व्यक्त केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *