Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘आत्मा’ अंतर्गत स्थापन शेतकरी गटांकडून मुंबईकरांना १५० टन ताजा भाजीपाला व फळांची...

‘आत्मा’ अंतर्गत स्थापन शेतकरी गटांकडून मुंबईकरांना १५० टन ताजा भाजीपाला व फळांची विक्री

सिन्नर : करोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉक डाऊनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठवण्यात आली आहेत. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून या उत्पादनांची रास्त दरात विक्री करण्यात येत आहे.

करोनामुळे देशात आपत्ती जाहीर करण्यात आली असून लॉकडाऊनमुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प ठप्प झाले आहे. सर्वच ठिकाणी त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा जाणवत असून अनेकांनी हात पुढे करीत मदतीला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला, दूध वाहतूक आणि विक्री करायला परवानगी दिली असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबापुरीत सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये यासाठी तालुक्यातील वडगाव सिन्नर, जोगलटेम्भी व दोडी येथील शेतकरी बचत गटांनी पुढाकार घेतला आहे.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हे शेतकरी गट स्थापन करण्यात आले असून उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मुंबईसाठी १५० टन भाजीपाला पुरवण्यात आला आहे.

वडगाव सिन्नरच्या वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गटामार्फत आठवडयातुन ३ वेळा लक्ष्मीनगर (गोरेगाव) , नर्सीपार्क (जुहू), शारण गृप (वर्सोवा) येथे उमेशा ठक्कर यांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

तर जोगटेम्भी येथील बळीराजा शेतकरी बचतगटाने नंदीनी छाब्रीया व मुकंद मेहरा यांच्या सहाय्याने मुंबई येथे ब्रिचकॅन्डी परीसरातील सागर दर्शान, सागर तरंग, माजदा, वैभव या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात व दोडी येथील शेतमाल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने मंत्रालय परीसरातील विविध सोसायट्यांमध्ये योग्य किमतीत भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे.

शेतातून पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी ५ ते १० किलोच्या बास्केट बनवण्यात आल्या आहेत. आपल्या गरजेप्रमाणे ग्राहक भाजीपाला व फळे असलेली ही बास्केट विकत घेत आहे. या बास्केटची किंमत सर्वसामान्य ग्राहकांच्या अवाक्यात असल्याने आजूबाजूच्या इतर सोसायट्यांकडून देखील भाजीपाला विक्री स्टोल ची मागणी वाढली आहे.

आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांना मुंबईत भाजीपाला विक्रीला पाठवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अन्नासाहेब गागरे यांनी पुढाकार घेतला. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संजय पडवळ यांच्या मार्गदर्षनाखाली प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाट, हेमंत काळे यांनी वाहतूक परवान्यासह भाजीपाला विक्रीसाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या