नाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील हरिहर किल्ल्याच्या मुख्य कमानींमध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने लोकवर्गणीतून व पुरातत्व निकषानुसार सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार बसविण्यात आला.
दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत जागर इतिहासाच्या अंतर्गत रविवार (दि. १२ ) या गड प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने हरिहर किल्ला अत्यंत महत्वाचा असुन संवर्धनाच्या अनुषंगाने किल्ल्याला सागवानी लाकडाचे प्रवेशद्वारबसवण्यात आले. गडाचे गतवैभव प्राप्त देण्यासाठी नाशिक येथील सह्याद्री प्रतिष्ठानने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या कार्यासाठी हर्षेवाडी ग्रामस्थांचे व स्थानिक सरपंच नामदेव बुरंगे यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले. सदरच्या प्रवेशद्वार लोकार्पण सोहळ्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रभरातुन सह्याद्री प्रतिष्ठानचे हजारो दुर्गसेवक उपस्थित होते…
या किल्ल्यावर काही हुल्लडबाजी करणारे, मद्यपी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालत असायचे. यावर जरब बसावा यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने हर्षेवाडी येथील हरिहर गडाच्या प्रवेशद्वारच्या कमानीमध्ये लाकडी दरवाजा बसविण्याबाबतचे पत्र दिले होते. यानंतर संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हर्षेवाडीच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. गावकऱ्यांनीदेखील याबाबत सहमती दर्शविली.
दरवाजा बसविल्यामुळे रात्री-मध्यरात्री गडावर गावकऱ्यांची नजर चुकवून मुक्कामासाठी जाणाऱ्यांवर चांगला जरब बसणार आहे. किल्ल्यावर बसविण्यात आलेला दरवाजा सुर्यास्तापुर्वी बंद करणे व सुर्योदयानंतर उघडण्याची जबाबदारीदेखील समितीच्या काही सदस्यांवर नियुक्त केली जाणार आहे. दरवाजा बसविल्यामुळे राखीव वनक्षेत्राला किंवा गडाला कुठल्याहीप्रकारचा धोका पोहचणार नसल्याची खात्री पटल्यानंतरच तोंडी परवानगी देण्यात आली आहे. .
-शिवाजी फुले, उपवनसंरक्षक (पश्चिम विभाग)