नाशिकरोड : करोनाकृत लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद पडल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतून बस व रेल्वेद्वारे सुमारे १ लाख ४७ हजार ३५५ परप्रांतीय महिला, पुरुष, लहान मुले त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्याचा लाभ स्थानिक भूमिपुत्रांना मिळणार असून रोजगाराच्या विविध संधी निर्माण झालेल्या आहेत.
सद्यस्थितीत सर्वच स्तरावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून परप्रांतीय आपापल्या मूळगावी परतल्याने विविध उद्योग, व्यवसाय क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये सुतारकाम, अॅल्युमिनियम विंडो तयार करणे, इंटेरियर डेकोरेटिंग, पिओपी, टाइल्स-फरशीची कामे, रंगकाम, फॅब्रिकेशन, बांधकाम मजूर, पाणीपुरी चाट सेंटर, मिठाई तयार करणे, काच बसवणे, ग्रीसिंग, मोटर मेकॅनिक, बेकरी कामगार, कंपनी कामगार या वर्गातले काम करणारे मजूर स्थलांतरित झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या स्थानिक भूमिपुत्रांना वरील व्यवसायात ५० टक्के रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
म्हणून करोना संकट नाहीतर संधी म्हणून स्थानिकांनी विचार केल्यास रोजगार व स्वयंरोजगाराची उपलब्धता आपल्याच परिसरात होऊ शकते. यासाठी सोशल मीडियावर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येते.
स्थलांतरित झालेले कामगार
जिल्हा रेल्वे बस
नाशिक। 9800 62241
अहमदनगर 16727 10833 जळगाव 2015 7700
नंदुरबार 624 26109
धुळे 468 10838
एकूण। 29634 117721