विंचुरदळवी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करत अवघ्या १३ सदस्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडल्याची घटना तालुक्यातील विंचूर दळवी येथे शुक्रवारी (दि.८) घडली.
विंचुरदळवीचे ग्रामपंचायत सदस्य जयराम दळवी यांची कन्या तेजल व सय्यदपिंप्री ता.नाशिक येथील साहेबराव पगार यांचे चिरंजीव आनंद यांचा विवाह माजी आमदार राजाभाऊ वाजे व नाशिकचे माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी दोन्ही बाजुने मिळुन १३ वर्हाडी उपस्थित होते.
करोनाची साथ संपल्यानंतरही साधेपणाने विवाहकार्य पार पाडणे काळाची गरज असल्याचे राजाभाऊ वाजे यांनी शुभाशिर्वाद देतांना सांगितले. विवाह संपन्न झाल्यानंतर लगेचच वधू- वरासह साक्षीदारांनी ग्रामपंचायत बाहेर बसवलेल्या आधुनिक हात धुण्याच्या यंत्राखाली हात धूवून ग्रामपंचायत कार्यालय प्रवेश केला.
ग्रामपंचायतमधील विवाह नोंदणी कार्यालयात ग्रामविकास अधिकारी तथा निबंधक संजय गिरी यांचेकडे विवाह नोंदणी करुन घेतली.
पुरोहीत प्रकाश कापसे व साक्षीदार म्हणून मुलीचे मामा गोपीनाथ पवार, मुलाचे भाऊ समाधान पगार व मुलीचे वडील जयराम दळवी उपस्थित होते.विवाह नोंदणीनंतर उभयतांना गिरी यांनी शुभेच्छा दिल्या.