Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकयेत्या दोन-तीन महिन्यात कलाग्रामचे काम पूर्ण होणार ना.छगन भुजबळ

येत्या दोन-तीन महिन्यात कलाग्रामचे काम पूर्ण होणार ना.छगन भुजबळ

नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये कालाग्रामची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात कालाग्रामचे काम पूर्ण होणार असून बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक, नाशिक विभागातील महिला स्वयंसहायता समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सव गोदाईचे उदघाटन कार्यक्रम आणि बचत गट पुरस्कार वितरण सोहळा आज डोंगरे वसतीगृह मैदान येथे हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्रामची निर्मिती केली असून आघाडी सरकारच्या काळात त्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र गेल्या पाच वर्षात ते काम रखडले होते. ते काम आपण सुरू करत असून महिलांना शंभर हुन अधिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत असून महिलांना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्द करून देण्यात आहे. या मध्ये महिला बचतगटाना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. हा महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प आपण नाशिक मध्ये करत होत आहे. यातून नाशिकच्या उत्पादनांना देशभरात आपण पोहचवू असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, समाजातील गोर गरिबांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम सरकार करत आहे. त्या दृष्टीने दारिद्र्य निर्मूलन करणं हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कारण समाजातील गोर गरीब कुटुंबातील महिलांचा बचतगटात समावेश असतो. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमातून व्यासपीठ मिळते असे सांगितले. ते म्हणाले की, शिवभोजन थाळी प्रकल्प योजना शासनाने सुरू केलेली आहे. यासाठी महिला बचतगटांनी पुढे येऊन सुरू करावे यातून गरिबांना अन्न मिळेलच तसेच महिलांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यातून गरिबांना दहा रुपयात जेवण देण्याचे शासनाचे उद्दिष्ट या माध्यमातून पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या