नाशिक : इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर अनेक लोक समर्थन करीत आहेत. तसेच अनेक समर्थक मोर्चे व आंदोलनाच्या तयारीतही आहेत. मात्र इंदुरीकर महाराजांनी यासाठी नकार दिला असून असं काहीही न करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना दिले आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी समर्थकांना आवाहन केले आहे.
दरम्यान मुलगा- मुलगी जन्माबाबत इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात वाद निर्मण झाला होता. यावरून समर्थक आणि विरोधक यांच्यात वाद सुरु होता. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तन रद्द झाले तर अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व गोष्टींना वैतागलेल्या इंदुरीकरांनी नुकतेच कीर्तन सोडून शेती करणार आहोत असेही सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीमच सुरू झाली आहे. त्यासाठी ‘चलो नगर’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
इंदुरीकर महाराजांनी तात्काळ याची दखल घेत पत्रक काढलं आहे. ‘आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केले आहे. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहेत. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं,’ अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.