नाशिक : जिल्ह्यातील करोनामुळे शहिद झालेल्या तीन पोलिस कर्मचार्यांबाबत दुख व्यक्त करून, जिल्ह्यातील सर्वच कर्मचार्यांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चिंता व्यक्त करीत, विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
तसेच, जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही केल्या.
मुंबई येथून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना बुधवारी (ता. २७) सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ओझर विमानतळावर उतरल्यानंतर अोझर विश्रामगृहावर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली.
बैठकीस नाशिक परिश्रेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, नाशिक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह उपस्थिती होते. यावेळी गृहमंत्र्यांनी जिल्ह्यातील करोनासंदर्भातील आढावा घेतला.
दरम्यान, मालेगाव येथे पोलिस बंदोबस्तादरम्यान बाधित तीन पोलिसांचा मृत्यु झाला. तसेच सव्वाशे पोलीस करोनाग्रस्त झाले त्याबाबत चिंता व्यक्त केली. करोनापासून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठीच्या विविध सूचना करताना बंदोबस्तावरील पोलिसांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. नाशिक शहर व मालेगावसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही घेतला.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मालेगावात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसह कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांची माहिती दिली. तर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक शहरात सुरू असलेल्या पोलिस बंदोबस्ताची आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती गृहमंत्र्यांना दिली.