नाशिक । एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, प्रवाशांना कार्यक्षम, तत्पर प्रवास सेवा उपलब्ध व्हावी. याकरिता महामंडळाकडून कार्यवाही केली जात आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत उत्पन्न वाढवा विशेष अभियान राबविले जांणार आहे.
एका महिन्यात (मागील वर्षाच्या तुलनेत) सर्वाधिक उत्पन्न आणणार्या आगारांना दरमहा रुपये 2 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली आहे. तसेच या अभियानाअंतर्गत जे आगार निकृष्ट कामगिरी करतील, त्या आगारातील जबाबदार अधिकार्यांना शिक्षादेखील केली जाणार आहे. हे अभियान 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश परब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये दिले होते.
त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत असताना त्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.त्यानुसार एसटीच्या 250 आगारांची (डेपो)प्रदेशनिहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणार्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा रुपये 2 लाख, द्वितीय आगारास रुपये दीड लाख व तृतीय आगारास 1 लाख रूपये असे बक्षिसे दिली जाणार आहेत.
याबरोबरच महामंडळाच्या 31 विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या विभागांना देखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक पटकावणार्याला 2 लाख, द्वितीय क्रमांकाला दीड लाख व तृतीय क्रमांकास एक लाख 25 हजार असे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अर्थात हे अभियान प्रयोगिक तत्वावर 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.
निकृष्ट कामगिरी करणार्या आगारातील संबंधित जबाबदार अधिकार्यांचा गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा अन्य कारवाई करणे, असे शिक्षेचे स्वरूप असणार आहे. त्यामुळे केवळ बक्षिसासाठीच नव्हे, तर शिक्षेपासून बचावण्यासाठीदेखील सर्व 250 आगारांनी आपली कार्यक्षमता वाढवावी हा हेतू आहे, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.