इगतपुरी : कसारा घाटामध्ये दि.११ रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास पती पत्नी व मुलगा हे वसईहुन ऊत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असतांना रिक्षा दुभाजकावर आदळुन चालक जागीच ठार झाला.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, करोना संसर्गामुळे मुंबईतील सर्व हातमजुर आपआपल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने जात आहेत. वसई येथुन संध्याकाळी राजेशकुमार यादव (वय ४६) हे पत्नी व मुलगा या कुटुंबाला घेऊन स्वता रिक्षा चालवीत उत्तर प्रदेशकडे एम.एच. ०२ डी. यु. २२६४ या रिक्षाने निघाले होते.
दि.११ रोजी सोमवारी पहाटेच्या सुमारास यादव यांची मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रिक्षा दुभाजकावर आदळुन झालेल्या या अपघातात राजेशकुमार यादव हे जागीच ठार झाले. महामार्ग पोलीसांनी यादव यांना इगतपुरीतील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले.
यादव यांच्या कुटुंबावर दुखाचा मोठा आघात झाला असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने इगतपुरीतील स्मशानगृहात त्यांच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी व मुलाला पुन्हा वसईला पाठवण्यात आले.