कोहोर | किसन ठाकरे
तालुक्यातील आदिवासी बहुल भागात तरुणांनी पारंपारिक शेतीला कुठल्याही प्रकारचा अडथळा न करता, पडीत जागेवर व बांधावर चिक्कूची झाडे लावून, शेतीत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
तालुक्यातील जोगमोडी नजिक हरणगांव येथील प्रयोगशील युवा शेतकरी गणेश जाधव यांनी स्वतःच्या शिवारात नवीन पिक लागवडीबाबत तंत्रज्ञान आत्मसात करीत शेतीत बद्दलही घडविला आहे.
भात, भूईमुग या पारपंरिक शेतीला कोणत्याही अडथळण्याविना बांधावर व काही प्रमाणात ओसाड जागेवर चिक्कूची व आंब्याची रोपे लावली आहेत.
या युवा शेतकऱ्यांने शेतात चिक्कूंच्या कालीपती जातीची वीस ते पंचवीस रोपे लावली आहेत. सद्यस्थितीत या झाडांना मोठ्याप्रमाणात चिक्कूंना बहर आलेला आहे. तसेच चिक्कूच्या झाडाशेजारी केशरी आंब्याचीही रोपे लावली आहेत. परंतु, यंदा ढगाळ वातावरणांमुळे आंब्याना फटका बसल्याने, मोहोर मोठ्याप्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा बहर कमी आला आहे.
सध्या लाँकडाऊनचा काळ असल्याने, शेतात घेतलेल्या चिक्कू फळांना सेंद्रीय पध्दतीने पिकवून गाव-पाड्यावर व मळ्यात सहज विक्री होत आहे. त्यामुळे कुंटूंबाच्या घरखर्चाला आर्थिक हातभार लागत आहे.
“खेड्याची समृध्दी गावचे गावपण आणि कृषी संस्कृती टिकवायची असेल तर माती आणि माता यांचा सन्मान करणारे शेतकरी निर्माण झाले पाहिजे. पारंपरिक भात, ऊस, भूईमुग शेतीबरोबर, नवनवीन उत्पन्न देणारी पिकांचेही तंत्रज्ञान आत्मसात केले पाहीजे. यासाठी तरुणांनी स्वतःला शेतीत झोकवून आमुलाग्र शेतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावे, असे प्रयोगशील शेतकरी गणेश जाधव यांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगितले.
चिक्कू हे फळ आरोग्याला उत्तम
चिकू हे फळ लहान असोत वा मोठे सर्वांना चिकू खाणं आवडते. चवीला गोड असण्यासोबतच चिकूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चिक्कू खाल्याने अग्नाशय मजबुत होते, तसेच इम्यूनिटी सिस्टमही चांगली होते. चिक्कूमध्ये वेगवेगळे प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटँमिन- ए, सी आणि ई यात अधिक प्रमाणात असतात. तसेच फायबर भरपूर असून कँल्शियम, फाँस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्ससारखे घटक असल्याने शरीराचे हाडे मजबुत होण्यास मदत होते.