नाशिक । राज्य शासनाकडून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी लाभार्थी शेतकर्यांचे बँक खात्याला आधार लिकींग असणे बंधनकारक आहे. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने 1 लाख 36 हजार पात्र शेतकर्यांचे आधार लिंक केले आहे. अवघी 400 खाते लिंक होणे शिल्लक आहे. 52 हजार शेतकर्यांचा डाटाही ऑनलाईन अपलोड करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकर्यांसाठी महात्मा फुले कर्ज माफी योजनेची घोषणा केली. त्यानूसार दोन लाखांपर्यंत शेतकर्यांचे कर्ज माफ होईल. येत्या मार्च पर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांची याद्या तयार करण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यांना देण्यात आले आहे. केवळ बँक खाते आधारला लिंकींग बंधनकारक करण्या व्यतिरीक्त कुठलीही अटी शर्ती बंधनकारक नसणार हे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आधार लिकींग प्रक्रीया हाती घेतील आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकेचे मिळून 1 लाक 36 हजार शेतकरी या योजनेंतर्गत कर्जमुक्तीस पात्र ठरले. त्यांचे आधार लिंक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. आता अवघे 400 शेतकर्यांचेच आधार अद्याप लिंक झाले नाही. त्यातील काहींचे बोटाचे ठसेच येत नसल्याने आधारच निघत नाही. तर काहीं शेतकरी, स्थलांतरीत आहे. काहींचे शेतीचे वाद आहेत.
जिल्हा प्रशासनाने कृषी आणि सहकार विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन डाटा अपलोडींगही सुरु केले आहे. 52 हजार शेतकर्यांचा डाटाही अपलोड झाला आहे. पुढील पंधरा दिवसातच उर्वरित शेतकर्यांचा डाटा अपलोड होईल. लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासानकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे.