मुंबई : कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु यासाठी प्रत्येकाने संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेतली पाहिजे. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहे. याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
इतर देशात गंभीर स्थिती असून त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पुर्णपणे सहकार्य करावे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.