मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.