मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत.
यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, लातूर ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण ६, गोंदिया ५, हिंगोली ५, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, सोलापूर शहर ३, रायगड २, धुळे २, वाशिम १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले, तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ६ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत.
तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ५७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन करण्यात यश आले आहे.