काँग्रेसची अवस्था ‘डबल ढोलकी’ सारखी- आ. विखे

काँग्रेसची अवस्था ‘डबल ढोलकी’ सारखी- आ. विखे

लोणी (प्रतिनिधी)- सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसची अवस्था ‘डबल ढोलकी’ सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधीचे विधान हे दुटप्पी आहे. सरकारमध्ये राहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही असे जाहीरपणे सांगायचे. मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला? तात्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलिदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची; दोन्ही बाजूने बोलायचे असे कसे चालेल? असा सवालही केला.

राज्यात एवढे मोठे संकट उभे आहे, मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीला सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत आला असतानासुध्दा राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्तीगत अडचणी असतील त्यामुळे ते मातोश्री बाहेर जाऊ शकत नाहीत; परंतु बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले? याचे कोडे राज्यातील जनतेला उलगडलेले नाही.

राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचे आपण पाहत आहोत. भावाअभावी शेती मालाची परवड झाली आहे. खरीप हंगाम समोर आला असताना नियोजन नाही, फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचा फार्स सुरू आहे. पालकमंत्रीसुध्दा औपचारिकता म्हणून जिल्ह्यात येऊन फक्त आढावा घेतात. ठोस निर्णय होत नसल्याने जनतेला या सरकारकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्त लोकांची दिशाभूल करणारे असून या निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच काँग्रेसही जबाबदार असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.

केंद्र सराकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून 28 हजार कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com