अमरावती : एकीकडे व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत असताना अमरावती येथील महाविद्यालयीन विद्यार्थानीनीं घेतलेल्या अनोख्या शपथेची जोरदार चर्चा आहे.अमरावती जिल्ह्यातील चांदुर येथील महिला व कला महाविद्यालयात विद्यार्थिंनीना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या मुलासोबत लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे.
दरम्यान आज सर्वत्र प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. अशातच या विद्यार्थिनींनी घेतलेली प्रतिज्ञान सर्वाच्याच चर्चेचा विषय झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करत मुलींनीचं अशी शपथ का घ्यावी? असा सवाल केला आहे. यामुळे सदर प्रकारानंतर सोशल मीडियावर चर्चा आहे.
या शाळेतील शिक्षकांनी सामाजिक कर्तव्य म्हणून विद्यार्थिनींमध्ये हुंडा देणाऱ्या मुलाशी लग्न करू नका किंवा भावी पीढीला हुंडा न घेण्याबाबत जागृत करा, अशा पद्धतीचं आवाहन केलं असलं तरी आज दिलेल्या शपथेत ‘प्रेम व प्रेमविवाह करू नये,’ असा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर या शपथतेची चर्चा सुरू आहे.
असा आहे शपथेतील मजकूर
मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसचं मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.