मुंबई : ‘झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली. संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले.
सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. पण ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे म्हणून खूप भावुक झाले. या मालिकेने खूप काही दिलं आणि त्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले, “खरं तर या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात खूपच बदल झाला. मालिकेतील काही प्रसंग डोळे पाणवणारे होते.
माझे वडील दोन वर्षांपूर्वी गेले आणि त्यानंतर ३ दिवसांनी स्क्रीनप्ले लिहीत होतो, ज्यामध्ये महाराजांच्या जाण्याचा आणि संभाजी महाराजांच्या वियोगाचा विषय होता. लिहीत होतो आणि डोळे पाण्याने डबडबले. या मालिकेने मला खूप समृद्ध केले. पडेल त्या आव्हानांना सामोरे जायची तयारी या मालिकेमुळे आली.”