अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केली आहे. तरीही लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. भाजी, किराणा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच, काही लोक विनाकारण घराबाहेर पडून दुचाकीवर शहरातून मुक्त संचार करत आहेत. यामुळे शहर पोलीस अशा लोकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. याची सुरवात मंगळवारपासून (दि.31) झाली आहे. लवकरच ड्रोनच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासन वेळोवेळी देत आहे. तरीही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे. तीन दिवसांपूर्वी लोकांनी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसले.
पोलिसांनी विनाकारण फिरणार्या, संचारबंदीचे नियम मोडणार्यांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तरीही पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडणार्यांची संख्या वाढत आहे. अशा लोकांवर आता ड्रोन नजर ठेवणार आहे.
ड्रोनच्या नजरेत आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह सावेडी, मुकुंदनगर, भिंगार परिसर, माळीवाडा, केडगाव आदी भागात ड्रोनची नजर असणार आहे. गरजेनुसार ड्रोनमध्ये वाढ केली जाणार आहे.