अहमदनगर (प्रतिनिधी) – तबलिगी जमातीच्या दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर नगरमध्ये दाखल झालेल्या 24 परदेशी व पाच भारतीय अशा 29 नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या सर्वांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतामध्ये दाखल झाले.
दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर त्यांनी नगरमध्ये वास्तव केले. पर्यटन व्हिसा असतांनी या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही जणांना क्वारंटाईन केले आहे.
जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या 24 परदेशी व पाच भारतीय अशा 29 नागरिकांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेतले. या सर्वांना अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.