मुंबई । करोनाचा महाराष्ट्रात शिरकाव वाढला आहे. गेल्या पावणेदोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांची पदवी अथवा डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राचीच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्य वर्गाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या सरासरी गुणांचा विचार करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही सांगितले.
बीएची तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून तेथील सहापैकी फक्त सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेतली जाईल असे सामंत म्हणाले. बीकॉम चेदेखील याप्रकारेच पार पडेल. आता जिथे 8 सेमिस्टर किंवा शैक्षणिक सत्र आहेत, तिथे आठव्या सत्राचीच परीक्षा होणार आहे.
ज्या अभ्यासक्रमात १० सत्रे असतील तिथे १० व्या सत्राचीच परीक्षा होईल. याशिवाय एमए, एमकॉम आणि इतर दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात एकूण चार सत्र आहेत, तिथे चौथ्या सत्राचीच परीक्षा होणार आहे. तर डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा कालावधी आणि सहा सत्रांचा आहे, अशा ठिकाणी सहाव्याच सत्राची परीक्षा होईल, असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.
सामाजिक अंतर ठेवून परीक्षा होणार
पदवीच्या केवळ अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये सामाजिक अंतर ठेवून या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करावयाचे आहेत ते केवळ जर्नल भरून घेतले जाणार आहे. बाकी प्रात्यक्षिके रद्द करावी अशी सूचना देण्यात आली आहे.