भास्कर मार्केटमध्ये एका गॅरेजसमोर लावलेल्या दुचाकीला अनोळखी उपद्रवी तरुणांनी बुधवारी भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पेटवून दिल्याचा प्रकार घडला. ही आग पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने विझवण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असल्याने शहरातील सर्व दुकाने व मार्केट बंद आहेत. याचा गैरफायदा घेत शहरातील भास्कर मार्केट मधील एका गॅरेजसमोर लावलेल्या तीन दुचाकीतील एका मोपेड दुचाकीला काही टवाळखोरांनी पेटवून दिले.
दुचाकीला आग लागल्याचे पाहून नागरिक आणि जिल्हा पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास कळविले.
या विभागाच्या पथकाने ही आग विझविली. विशेष म्हणजे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा पोलीस ठाणे आहे. तरीही उपद्रवी तरुणांनी हे कृत्य केले. त्यांचा शोध पोलीस घेत आहे.