अबब…तीन हजार परप्रांतीयांचे गावी जाण्यासाठी अर्ज; जिल्हाधिकारी कार्यालयात तोबा गर्दी

अबब…तीन हजार परप्रांतीयांचे गावी जाण्यासाठी अर्ज; जिल्हाधिकारी कार्यालयात तोबा गर्दी

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्हा प्रशासनाकडून राज्याच्या जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी परवानगी देण्यासाठी एका संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. अवघ्या दोनच दिवसांत याठिकाणी जवळपास तीन हजाराच्या आसपास अर्ज आलेले असल्याचे समजते.

यामध्ये जवळपास ९६ अर्ज स्वीकारण्यात आले असून या व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित अर्ज फेटाळण्यात आल्याचे समजते. अर्जाचे काय झाले याची माहिती घेण्यासाठी आज नाशिक शहरातील परप्रांतीय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोबा गर्दी केली होती. याठिकाणी कुठेही सामाजिक अंतराचे भान पाळले जात नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातुन राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासासाठी पास मिळत असल्याच्या अफवेमुळे शहरासह जिल्ह्यातील शेकडो परप्रांतीय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.

दरम्यान, पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आल्यानंतर या परप्रांतीय नागरिकांनी माघारी धाडण्यात आले. टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्यामुळे राज्यात वेगवेगळया कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचा मोठा प्रश्न  निर्माण झाला असताना राज्य सरकारकडून या नागरिकांना माघारी परतण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

यानुसार विद्यार्थी, कामगार आणि मजूरांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन त्यांना माघारी परतता येणार आहे. दरम्यान, काल आणि आज दोन दिवसांत नाशिकमधील जवळपास एक हजार पेक्षा अधिक परप्रांतीय नागरिकांना विशेष रेल्वेने मायभूमीत पाठविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com