सटाणा (ता प्र) | कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीला सामान्य नागरिकांनी अधिक प्रतिसाद दिला आहे. शहरासह परिसरात पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू मात्र सूर आहेत. यामध्ये शहरातील मेडिकल, किराणा तसेच शेती साहित्याची दुकाने सुरु आहेत.
सद्यस्थितीत आठवडेबाजार बंद करण्यात आला असला तरी शहरातील बसस्थानक मागे असणाऱ्या दैनिक बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांनी आवश्यक दक्षता घेऊन शहरासह नववसाहत परिसरात हातगाडीवर फिरत्या स्वरूपात सुविधा उपलब्ध केली, तर नेहमीच्या एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही अशी मागणी होत आहे.
कोरोणाचा शिरकाव प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी कमी करून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील किराणा दुकांनामध्ये एकावेळी एक व्यक्तीला प्रवेश देऊन काळजी घेतली जात आहे.
नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस अधिक्षक शशिकांत शिंदे, सनपा मुख्याधिकारी हेमलता डगळे, पों. नि.नंदकुमार गायकवाड यांनी ‘देशदूत’शी बोलताना केले.