मुंबई | किशोर आपटे
पंतप्रधान मोदी यांच्याशी मुख्यमंत्र्याचा फोन वरून संवाद झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नामनियुक्त सदस्यत्व देण्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर करोना आणि राजकीय स्थितीबाबत माहिती देवून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवरची नियुक्ती करण्याबाबत राजभवनावरून हालचाली झाल्याचे सांगण्यात येत आहे.
करोनाच्या संकटकाळात आम्ही सर्व एकजुटीने आपल्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्रात राजकारण होत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राजभवनावर मुख्य न्यायाधिशांच्या शपथ ग्रहणाच्या कार्यक्रमानंतर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी राज्यपालांची घटनात्मक पेचाबाबत चर्चा झाली आहे.
यावेळी कुंभकोणी यांनी नियम आणि तरतुदी काही असल्या तरी सध्या राज्यात कोरोनाची अभूतपूर्व आणिबाणी असताना राज्यपालांनी पालकत्वाची भुमिका म्हणून विशेषाधिकार वापरून अपवादात्मक स्थितीत मुख्यमंत्र्यांना नामनियुक्त सदस्त्यत्व दयावे असे सूचविल्याचे सांगण्यात येते.
या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राज्यपालांना पत्र देवून विनंती केली होती. त्यामुळे राज्यपालांनी सध्याच्या स्थितीत किमान सहा जून पर्यंत नामनियुक्त सदस्यत्व देण्याबाबत निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजभवनातून याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.