चाळीसगाव –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली, संचारबंदीचे उल्लघन करुन विनाकारण बाहेर फिरण्यांवर शहर व ग्रामीण पोलिसांनी कडक पावले उचलत 22 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी हजार रूपयांचा दंड ठोठावला.
अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाय्यक पोलिस निरिक्षक मयुर भामरे, आशिष रोही, उपनिरिक्षक महाविर जाधव, हवालदार गणेश पाटील, बापुराव भोसले, पंढरीनाथ कदम, पकंज पाटील, नितीन पाटील, दीपक पाटील, भूषण पाटील, विजय शिंदे, अभिमन पाटील, राहुल गुंजाळ हे शहरात गस्त घालीत असतांना त्यांनी शहरातील सिग्नल चौकात कलम 188 प्रमाणे 12 जणांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त करून अटक केली.
तसेच ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकार, हवालदार नितिन अमोदकर, गोकुळ सोनवणे, दिपक ठाकुर, दिलीप रोकडे, शंकर जंजाळे, राजेंद्र सांळुखे, कैलास पाटील, विलास पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी ग्रामिण भागात गस्त घालीत असतांना 10 जण विनाकारण फिरतांना आढळून आले. शहर व ग्रामीण पोलिसांनी या 22 जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.