Friday, April 26, 2024
HomeनाशिकBlog : करोना वाॅरीयर्स : नागरी सेवादूत अर्थात आपले प्रशासन

Blog : करोना वाॅरीयर्स : नागरी सेवादूत अर्थात आपले प्रशासन

संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय.
पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न.नागरी सेवा civil services म्हणजे लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभच आहे .  आणि आज या महासंकटाच्या काळात हा आधारस्तंभ कधी नव्हे इतका महत्वाचा ठरू लागलाय. त्यामुळेच आजचा दिवस तर अधिकच महत्वाचा आहे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी . या लॉक डाऊन च्या काळात ज्या ज्या सेवांमुळे आपलं जगणं सुसह्य झालंय अशापैकी महत्वाची सेवा म्हणजे भारतीय प्रशासन. सरकारी अधिकारी , कर्मचारी आणि सगळा नोकरवर्ग.
आपण सगळे घरात आराम करीत असताना हा वर्ग मात्र अहोरात्र झटतोय . काही अधिकारी तर चोवीस तास ऑन ड्युटी आहेत. आज या वर्गावर संपूर्ण निर्णय प्रक्रियेची धुरा आहे. परिस्थितीचा आढावा घेत राहून सातत्याने निर्णय घेत राहणे, आदेश काढणे आणि या आदेशांची अंमलबजावणी करणे हे त्यांचे महत्वाचे काम. निर्णय योग्य ठरला तर कुणी त्याचे कौतुक करणार नाही कारण ते त्यांचे कामच आहे मात्र एखादा निर्णय जरी चुकला तर दोषारोप करायला मात्र सर्वजण हजर असतात. सतत कर्तव्याची टांगती तलवार ज्यांच्या डोक्यावर आहे ते आपलं भारतीय प्रशासन अत्यंत निस्वार्थी पणे या संकटाशी दोन हात करतंय.
काही मंडळी चुकतही असतील परंतु ज्याप्रमाणे उडदा माजी काळे गोरे अशा भिन्न प्रवृत्ती कुठे नाही दिसत? पण त्यांच्यामुळे जे चांगले काम करताय त्यांचे महत्व किंचितही कमी होत नाही .
भारतीय प्रशासनात अगदी उच्च पदावर असणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यापासून ते अगदी शेवटच्या सरकारी नोकरपर्यंत प्रत्येकाच्या माणुसकीचा प्रत्यय येतो तो या संकटकाळात . आज सर्व सरकारी ऑफिसेस मधील अत्यावश्यक सेवा विभाग सुरू आहेत . दररोज बदलनाऱ्या परिस्थतीत बैठका घेऊन पुढील योजना तयार केली जातेय.
सर्व लहानमोठे मंत्री, सर्व जिल्हाधिकारी , पोलीस प्रशासकीय अधिकारी , जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करीत आहेत, काही वेळा कठोर निर्णय घेत आहेत. पण काही समाजकंटक मात्र या नियमांची पायमल्ली करतायेत, पण नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवायला देखील ते तत्पर आहेत. सर्वसामान्य जनतेचा त्यांना पाठिंबा आहे.
नाईलाजाने काही अधिकारी घरी असतील पण घरून देखील ते आपली सेवा अखंडपणे करीत आहेत.
शासकीय नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी नोकरांवर तर याची सर्वात जास्त भिस्त आहे, एकवेळ निर्णय घेणे सोपे पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे कठीण वाटते. आणि तेही सव्वाशे कोटीच्या या देशात.
ठिकठिकाणी हे सेवादूत आपली सर्व देत आहेत. कुठे भुकेल्याच्या पोटी घास घालतायेत, कुठे आरोग्यसेवा पुरवतायेत, कुठे आपल्या जन्मभूमिपासून दूर अडकून पडलेल्याना निवारा देतायत, त्यांचं समुपदेशन करतायेत. प्रसंगी साम दाम दंड भेद याचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.
आज पूर्ण एक महिना झाला लॉक डाउन होऊन पण आपल्या सर्व दैनंदिन गरजा व्यवस्थित भागवल्या जातायेत, त्यात कुठेही खंड पडलेला नाही, वेळेवर होणारा पाणीपुरवठा असो वीज असो रेशनिंग असो की सुरक्षा व्यवस्था असो. ही सर्व या सेवादूतांचीच किमया आहे.
अगदी आपले प्रधानमंत्री , मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, संरक्षणमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री , सर्व राज्यांचे मंत्रिमंडळ आणि त्यांची मंत्रालय या सर्वांवर ही मोठी जबाबदारी आज येऊन पडलीय आणि या आपत्कालीन परिस्थितीत ते न डगमगता लढतायेत, नागरिकांना धीर देतायत, त्यामुळे हा सर्व प्रशासन विभाग व हे सर्व शासकीय सेवक कोणत्याही देवदूतापेक्षा कमी नाहीयेत.
प्रचंड तणावपूर्ण परिस्थितीत काम करण्यासाठीच त्यांना घडवलं जात . बऱ्याचवेळा सरकारी नोकरी म्हणजे ऐशो आराम, भरपूर पैसा, भ्रष्टाचार असाच आपला समज असतो, परंतु हे अर्धसत्य आहे. खरंतर सरकारी नोकरी म्हणजे निर्णयकौशल्य, जबाबदारीची जाणीव, कोणत्याही निर्णयांची जबाबदारी घेणं, सेवेत तत्पर असणं, प्रामाणिकपणा, देशसेवा, देशाभिमान आणि अखंड सेवाव्रत. “सत्यमेव जयते” या ध्येय वाक्यावर निष्ठा.
आज या नागरी सेवा दिनी या कोरोनाच्या संकटाशी हिंमतीने दोन हात करणाऱ्या या सगळ्या प्रशासनाला आपण वंदन करूया, आपल्या करोडो हातांच बळ त्यांना देऊया, कोणतेही नियम मोडून त्यांची डोकेदुखी वाढवण्यापेक्षा नियम पाळून सहकार्य करूया, त्यांच्
या सक्षम होताना सेवेची जोड देऊया.
आणि या लढ्यात अखंड सोबतीच वचन देऊया.
सर्व प्रशासकीय सेवकहो
आम्ही सर्व सच्चे भारतीय सदैव तुमच्या सोबत आहोत,
सलाम तुमच्या जिद्दीला!
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !
सलाम तुमच्या सेवभावाला !तनुजा सुरेश मुळे/ मानकर, नाशिक (लेखिका ब्लॉगर आहेत)
- Advertisment -

ताज्या बातम्या