जळगाव –
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन भिन्न विषय आहेत. या प्रकरणातून सत्य बाहेर येईल, अशी भीती काही लोकांना आहे. पोलीस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची सकाळी बैठक होऊन तपासावर चर्चा होते आणि दुपारी ४ वाजता कोणतीही सूचना न देता केंद्र सरकार हे प्रकरण राज्याकडून काढून स्वतःकडे घेते. हे प्रकरण घडले, तेव्हा राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार होते. त्यामुळे त्यांना काही विषय झाकायचे आहेत व काही लपवायचे आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण अचानक काढून घेणे योग्य नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेसंदर्भात पोलिसांनी केलेली कारवाई, साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांवर भरलेले खटले यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत योग्य, अयोग्य काय याची चौकशी व्हावी आणि खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे खा.शरद पवार यांनी सांगितले.
ते नाशिकला रवाना होण्यापूर्वी जैन हिल्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संतापजनक विद्रोही लिखाण करणे, हा देशद्रोह असतो का? या विरोधात मी भांडतो आहे, असेही ते म्हणाले.