Thursday, April 25, 2024
Homeनगरजि. प. शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण

जि. प. शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र शासनाने नुकताच सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात रिक्त जागावर नियुक्ती देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय अतिशय चुकीचा असून मराठी शाळेतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी केला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेमध्ये अनेक शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या शासनाने तातडीने भराव्यात. आज राज्यामध्ये उच्चशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या संख्येने वर्षानुवर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असताना, हा निर्णय शासनाने कसा घेतला? याबाबत समाजामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांचा दर्जा, गुणवत्ता उंचावत असताना व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमांच्या शाळेकडे सुरू असताना रिक्त शिक्षकांची पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. परंतु शासन रोज नवीन नवीन परिपत्रके काढून शिक्षक भरतीला विलंब करीत आहे, ही बाब शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पूर्ण वेतनावर शिक्षकांची भरती न करता वीस हजार रूपये मानधनावर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती करणे म्हणजे भविष्यात शिक्षक भरती न करण्याचा पुढील डाव आहे.

नगर जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर शिक्षकांच्या जवळपास 250 जागा रिक्त असून मुलांना इंग्रजी व गणितासाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उच्च प्राथमिक शाळांच्या पटावर परिणाम होण्याची भीती वाढली आहे. तसेच अनेक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालक जिल्हा परिषदेतील शाळांतून विद्यार्थ्यांना खासगी शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत आहे. परिणामी उच्च प्राथमिक वर्ग बंद होण्याची भीती आहे. जर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर रिक्त जागावर नियुक्ती दिल्यास वर्षानुवर्षे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले हजारो बेरोजगार डीएड युवक नोकरी पासून वंचित राहतील. जर हा निर्णय शासनाने मागे घेतला नाही तर या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

या प्रसिद्धीपत्रकावर दत्ता पाटील कुलट, राजकुमार साळवे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, साहेबराव अनाप, विद्या आढाव, अंजली मुळे, विठ्ठल फुंदे, सखाहरी दाते, मनोज सोनवणे, सत्यवान मेहरे, विजय ठाणगे, आर. टी. साबळे, संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाठ, विजय नरवडे, आबा दळवी, नारायण पिसे, बाबा खरात, ना. चि. शिंदे, शरद सुद्रिक, अश्पाक शेख, संदीप ठाणगे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या